माणदेश एक्सप्रेस न्युज
विटा : महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी जिल्ह्यावर आलेल्या महापुराच्या संकटावर अगदी शर्तीचे प्रयत्न करून मात केली आहे.
कोयना वारणा व राधानगरी धरणाच्या पाण्याचे नियोजन तसेच कर्नाटक सरकार बरोबर समन्वय ठेवत अलमट्टी धरणाच्या पाण्याचा विसर्ग या सर्व बाबींचे दूरदृष्टी ठेवून तातडीने यंत्रणा कामाला लावत त्यांनी येऊ घातलेल्या महापुराच्या संकटातून पूरग्रस्त जनतेला अगदी अलगदपणे बाहेर काढत त्यांना भयमुक्त करण्याचे काम जयंत पाटील यांनी केले आहे. त्याचबरोबर पुराचे पाणी दुष्काळग्रस्त भागाकडे वळवल्याने ते पूरग्रस्त व दुष्काळग्रस्त भागाचे देवदूत बनले असल्याची मत विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी व्यक्त केल.
पुढे बोलताना ते म्हणाले, गेल्यावर्षी महापूर आल्यावर त्यांच्या कुटुंबीयांनी स्वतः रोज हजारो लोकांना दोन वेळचे जेवण, नाष्टा, चहा, पाणी या सर्वांची राहण्याची सोय केली होती. त्यांनी स्वतः नागरिकांचे हाल पाहिले असल्याने महापुराची दाहकता काय असते हे माहीत आहे, त्यामुळे त्यांनी योग्य नियोजन करून जनतेला येणाऱ्या मोठ्या संकटातून सावरले आहे. कोरोना सारखा संसर्गजन्य रोग घोंगावत असताना देखील ते स्वतःच्या जीवाची पर्वा न करता प्रत्येक ठिकाणी जाऊन पाहणी करत संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देत होते.
त्यांनी दूरदृष्टी ने केलेल्या नियोजनामुळे महापुरासारखे महासंकट रोखण्यामध्ये यश आले आहे. त्याचबरोबर खानापूर, आटपाडी, तासगाव, कवठेमंकाळ या दुष्काळी तालुक्यात टेंभू, ताकारी म्हैसाळ यासारख्या जलसिंचन योजनांना महापुराचे जादाचे पाणी देऊन सर्व तलाव भरून घेतल्याने दुष्काळी भागातील जनता सुद्धा त्यांच्यावर खूप समाधान व्यक्त करताना दिसत आहे. संकटावर मात कशी करावी त्यातूनच गरजवंतांना मदतही कशी करावी हे जयंत पाटील यांनी आज दाखवून दिले असल्याने जयंत पाटील हेच पूरग्रस्त व दुष्काळग्रस्त भागाचे देवदूत बनले आहेत.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज