खाजगी वाहनातून आंतर जिल्हा प्रवासासाठीची ई पास ची सक्ती रद्द करा : आटपाडी तालुक्यातील राष्ट्रवादीचे 'या' नेत्याने केली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मागणी
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी दि. २३ (प्रतिनिधी) : स्वतःच्या अथवा भाड्याच्या चार चाकीतून पर जिल्ह्यात प्रवास करताना घ्याव्या लागणाऱ्या ई पास ची सक्ती रद्द करावी अशी महत्वपूर्ण मागणी राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यकारणी सदस्य सादिक खाटीक आटपाडी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेकडे केली आहे.
अनोळखी लोकांसोबत एस.टी.बस मधून प्रवास करताना ई पास लागणार नाही, पण स्वतःच्या अथवा भाड्याच्या गाडीतून स्वतःच्या कुटूंबातल्या सदस्यांसोबत प्रवास करताना लागणारी ई पास ची सक्ती अन्यायी आहे. राज्य सरकारने ही सक्ती त्वरीत रद्द करावी अशी मागणी आपण मुख्यमंत्री महोदयांकडे लाखो प्रवाशांच्या वतीने करीत असल्याचे सादिक खाटीक म्हणाले.
मार्च च्या मध्यापासून टप्या टप्प्याने राज्यातील एस.टी. वाहतूक बंद करण्यात आली. मध्यंतरी एस.टी. ची जिल्हातंर्गत वाहतूक सुरू करण्यात आली. मर्यादित २२ प्रवाशाच्या वाहतूकीसाठी दिल्या गेलेल्या परवानगी अंतर्गत ही पुरेसे प्रवाशी उपलब्ध न झाल्याने राज्यातल्या अनेक आगारातल्या अनेक फेऱ्या बंद केल्या गेल्या. तथापि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एस.टी. तून आंतर जिल्हा प्रवाशी वाहतूकीसाठी परवानगी देवून मोठा अभिनंदनीय निर्णय केला.
सोशल डिस्टीग्शन्स आणि लॉकडाऊनच्या नियमांचे बंधन एस.टी.ला ही घातले असले तरी या एस. टी. तून केल्या जाणाऱ्या प्रवासासाठी ई पास ची सक्ती घातली गेली नाही. मात्र खाजगी प्रवाशी वाहतुकीसाठीचे ई पास बंधन मात्र राज्यातल्या लाखो नागरीकांना जाचक अन्यायकारक वाटू लागले आहेत. एस.टी.तून केला जाणारा प्रवास सुरक्षित आणि खाजगी वाहतातून केला जाणारा प्रवास असुरक्षित कसा? कोरोणाचे संकट सर्वांवर सारखेच घोंगावतेय ना? मग एस.टी. च्या प्रवासाला ई पास नाही आणि खाजगी प्रवासाला बंधनकारक? एक तर एस.टी. सह सर्वच प्रकारच्या वाहनांच्या प्रवाशी वाहतूकीसाठी सरसकट ई पासची सक्ती करावी अथवा ही अट सर्वांसाठीच रद्द केली जावी.
जिल्ह्याच्या सिमांवर, अनेक महत्वाच्या नाक्यांवर, ठिकाणांवर नाकाबंदी करण्यात आली आहे. कसून केल्या जाणाऱ्या तपासणीतून खाजगी अथवा स्वतःच्या वाहनातून प्रवास करणारांची पुरती दमछाक होताना दिसत आहे. ई पास मधील प्रवाशी मर्यादेपेक्षा एखादा - दुसरा प्रवाशी जास्त असेल तर दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागत आहे.
काही ठिकाणी चिरीमिरीच्या तडजोडीतून मार्ग काढले जात आहेत. तथापि प्रवासातल्या एस.टी. च्या प्रवाशी संख्येची तपासणी होताना आढळत नाही. ई पास मिळवितानाही मोठी कसरत करावी लागत आहे. गरजेच्या वेळी पास मिळत नाही ,प्रत्येक वेळी आणीबाणीचा प्रसंग आणावयाचा कोठून? जीवनातल्या अनेक खाजगी कामांसाठी प्रवास करणे महत्वाचे असते आणि ठरते. किमान एक दोन वेळी प्रयत्न केल्यावर ई पास मिळतो. ई पास साठी आवश्यक असणाऱ्या, प्रवास करणाऱ्या सर्वांच्या फिटनेस तपासणीसाठी ही मोठा वेळ जात आहे.
राज्यातंर्गत आणि आंतरराज्य प्रवाशी आणि माल वाहतूकीसाठी केंद्र सरकारने परवानगी दिल्याचे आणि राज्यांनीही याची अंमलबजावणी करण्याचे सुचित केल्याचे पार्श्वभूमीवर राज्यातल्या आपल्या लोकप्रिय सरकारने स्वतःच्या अथवा खाजगी गाड्यातून प्रवाशी वाहतूकीसाठी सोशल डिस्टींग्शन आणि लॉकडाऊनचे नियम लावून तसेच प्रवाशी मर्यादेची नियमावली जाहीर करून जाचक ई पास ची अट रद्द करावी. या ई पास रद्द च्या निर्णयाद्वारे करोडो प्रवाशी नागरीकांना मोठा दिलासा द्यावा अशी अपेक्षा ही शेवटी सादिक खाटीक यांनी केली आहे.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज