जिल्ह्यात विविध उपक्रमाव्दारे कृषि संजीवनी सप्ताह साजरा
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्रात केलेली भरीव कामगिरी लक्षात घेवून त्यांच्या 1 जुलै जयंतीनिमित्त राज्यात 1 ते 7 जुलै 2020 या कालावधीत कृषी संजीवनी सप्ताह साजरा करण्यात आला. राज्यात खरीप हंगाम 2020 यशस्वी करण्यासाठी व आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी राज्यातील कृषी विभाग आणि विद्यापिठे येथील अधिकारी आणि शास्त्रज्ञ शेतकऱ्यांच्या बांधावर जावून संवाद साधण्यासाठी कृषी संजीवनी सप्ताह साजरा करण्यात आला. कृषि संजीवनी सप्ताह जिल्ह्यात सर्व तालुक्यातील एकूण 175 गावात शेतकऱ्यांच्या बांधावर जावून साजरा करण्यात आला.
कृषि दिनानिमित्त 1 जुलै रोजी जिल्हास्तर कार्यक्रम मिरज तालुक्यातील बेडग या गावात साजरा करून कृषी सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बेडग येथील शेततळ्यामधील मत्स्त शेतीस भेट देण्यात आली. पायाप्पाचीवाडी येथे एम. आर. ई. जी. एस अंतर्गत बांधावर फळबाग लागवडीचा आंबा वृक्ष लागवड करून शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे तर प्रमुख पाहुणे म्हणून जितेश कदम उपस्थित होते. तसेच जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बसवराज मास्तोळी, कृषि संशोधन केंद्र कसबे डिग्रजचे प्रभारी अधिकारी श्री. कठमाळे, कृषि उपसंचालक सुरेश मगदूम, उपविभागीय कृषि अधिकारी हणमंत इंगवले, आत्माचे प्रकल्प उपसंचालक प्रभाकर पाटील, कृषि विकास अधिकारी विवेक कुंभार आदि उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांच्याहस्ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री हरीत क्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पुजन व दिप प्रज्वलन करण्यात आले.
सप्ताह दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर राखून जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी सर्व तालुक्यातील कार्यक्रमास भेट देवून सप्ताहाची कार्यपध्दती विशद करून कृषी विभागाच्या योजनाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. जिल्हास्तरावरील अधिकारी, संबंधित उपविभागाचे उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, शास्त्रज्ञ व क्षेत्रीय अधिकारी / कर्मचारी यांनी कृषि विभागाच्या विविध योजनांविषयी मार्गदर्शन करून कृषि संजीवनी सप्ताह यशस्वीपणे साजरा केला.
कृषी संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी श्री. कठमाळे, शास्त्रज्ञ डॉ. मनोज माळी, डॉ. रत्नकुमार दिक्षित, डॉ. राठोड, डॉ. महाजन, जाधव, डॉ. भाकरे यांनी शास्वत शेती, पिक उत्पादनावर परिणाम न करता पिक उत्पादन खर्च कमी करणे, सुधारित जातीचा अवलंब, एकात्मिक कीड व रोग नियंत्रण, फळबाग लागवड, आंबा व पेरू घन लागवड याबाबत विद्यापीठाच्या शिफारसीसह सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना विविध शंकांचे निरसन केले.