लॉकडाऊन बाबत आटपाडी शहरातील व्यापारी, नागरिक गोंधळात
दुकाने चालू की बंद? वेगवेगळ्या चर्चा
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : कोरोना या संसर्गजन्य विषाणुने संपूर्ण देशात आपला व्यापक प्रसार निर्माण केला आहे. हा प्रसार रोखण्यासाठी ग्रामीण भागातुन मोठ्या गावांमध्ये व शहरामध्ये या विषाणुचा संसर्ग साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनचा निर्णय जिल्हास्तरावर घेतला. परंतु यामध्ये महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत या ठिकाणी लॉकडाऊन तर ग्रामीण भागात जनता कर्फ्यू असा निर्णय घेतला गेल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
परंतु प्रशासनाच्या या निर्णयाने आटपाडी शहरातील नागरिकांना व व्यापाऱ्यांना मात्र गोंधळात टाकले असून आटपाडी शहरात नक्की लॉकडाऊन की जनता कर्फ्यू? असा प्रश्न पडला आहे. आटपाडी तालुका हा कोरोनाच्या पहिल्या टप्यात कोरोनामुक्त होता. परंतु मुंबई, पुणे, अहमदाबाद कनेक्शनमुळे जिल्हाभर आटपाडी तालुका चर्चेला गेला.
तालुका ठिकाण तेथे नगरपंचायत अथवा नगरपालिका असा नियम केल्याने राज्यातील तालुक्याच्या ठिकाणी असणाऱ्या ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायत अथवा नगरपालिका मध्ये झाले. परंतु आटपाडी तालुक्यातील राजकीय अनस्थेमुळे याठिकाणी ग्रामपंचायत कायम राहिली. तसे पहिले तर लोकसंख्येच्या बाबतीत आटपाडी शहराची लोकसंख्या ही शिराळा, कडेगांव, कवठेमंहाकाळ व खानापूर या नगरपंचायत असलेल्या शहरांपेक्षा जास्त आहे. असे असतानाही केवळ ग्रामपंचायत आहे या तांत्रिक अडचणीमूळे आटपाडी शहरामध्ये लॉकडाऊन लावण्यात आलेला नाही. तर जनता कर्फ्यू हा पर्याय आटपाडी सारख्या शहरात यशस्वी होऊ शकत नाही. प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या समन्वयाअभावी नागरीक, व्यापारी यांचा रोष पत्करण्यास ग्रामपंचायतीची आपत्कालीन व्यवस्यापन समिती तयार का? हा मोठा प्रश्न आहे. लॉकडाऊनचा निर्णय जाहीर करताना संपूर्ण जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन करायला हवे होते. परंतु महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत येथे लॉकडाऊन व ग्रामीण भागात जनता कर्फ्यू असा असल्याने आटपाडी भाग ग्रामीण (शासकीय भाषेत) असल्याने आटपाडीमध्ये जनता कर्फ्यू राहणार व शहरातील नागरिक जनता कर्फ्यू ला कसा प्रतिसाद देतात यावर जनतेचे भवितव्य अवलंबून राहणर आहे.