ग्रामीण भागातील लोकांचे प्रश्न सोडवा, त्यांना तातडीने मदत द्या : विविध संस्थांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : कोवीड-१९ च्या पार्श्र्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायत, स्थानिक संस्था, कोरो संस्था मुंबई यांचे वतीने ग्रामीण भागातील लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी व त्यांना तातडीने मदत मिळवून देण्यासाठी सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांना निवेदन देण्यात आले.
कोवीड १९ च्या पार्श्र्वभूमीवर कोरो व संस्थांच्या माध्यमातून लोकपुढाकार प्रक्रिया जून २० पासून सूरूवात झाली. सांगली जिल्ह्यातील जत, मिरज, शिराळा, खानापूर व आटपाडी तालुक्यातील १३ गावांमधून तालूका प्रशासनापुढे प्रश्र्न मांडण्यात आले. त्यामध्ये गावातील अन्नसूरक्षा यंत्रणा सूसज्ज करणे, रोजगार व उपजीविकेच्या पर्यायी व्यवस्था उभी करणे, महिला हिंसाचार व सामाजिक भेदभाव रोखणे, आरोग्य यंत्रणा अद्ययावत ठेवणे व आपत्ती व्यवस्थापन समिती सक्षम करणे. या मागण्यांचे निवेदन सांगली जिल्हाधिकारी, सांगली जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी, पालकमंत्री व संबंधित तालूक्यांचे तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना देण्यात आले.
यासाठी जत तालुक्यात ग्रामीण विकास संस्था कोसारीचे विवेक टेंगले, मिरज तालुक्यात अग्निपंख एकल महिला संस्थेच्या फैरोझा पटेल, शिराळा तालुक्यातील जनकल्याण सेवाभावी संस्था जांभळे वाडीच्या सरिता देवकर तसेच अग्रणी सोशल फौंडेशन विटा या संस्थांनी प्रयत्न केले. तर कोरो संस्था मूंबईचे विभागीय समन्वयक माधवभाऊ गडदे यांनी विशेष मार्गदर्शन केले.