सरकार पडणार अशा चर्चा विरोधकांना सुरु ठेवाव्या लागतात : जयंत पाटील
नाशिक : सरकार पडणार अशा चर्चा विरोधकांना सुरु ठेवाव्या लागतात असा टोला जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी विरोधकांना लगावला.
जलसंपदामंत्री जयंत पाटील हे नाशिक वैतरणेचं पाणी मुकणेमध्ये सोडण्याच्या पार्श्वभूमीवर आले होते. यावेळी पाटील यांनी राज्यातील राजकीय स्थितीवरही भाष्य केलं आहे. ’संजय राऊतांच्या मुलाखतीचे भाजप कौतुक कसं करणार? सरकार पडणार अशा चर्चा विरोधकांना सुरू ठेवाव्या लागतात. संख्या 105 असल्याने विरोधकांचा असा प्रयत्न आहे,’ असं म्हणत जयंत पाटील यांनी भाजपला टोला लगावला आहे.
’काँग्रेसवर अन्याय होत कामा नये. मुख्यमंत्री काँग्रेसशी देखील चर्चा करत आहेत. काँग्रेसकडून नाराजी नाही. आम्ही सगळे एकत्र होतो. अशोक चव्हाण नाराज नाहीत, हे बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं आहे. छोट्या मोठ्या गोष्टी झाल्या तर सरकारच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण करण्याची आवश्यकता नाही,’ असेही जयंत पाटील म्हणाले.