"सरकार पलटी होऊ नये म्हणून कार पलटली", अखिलेश यादव यांची भाजपच्या योगी सरकारवर जोरदार टीका
लखनऊ : पोलिसांची हत्या करणारा गँगस्टर विकास दुबे ला आज सकाळी एन्काऊंटरमध्ये ठार करण्यात आले. मध्य प्रदेशच्या उज्जैनमधून विकास दुबेला काल अटक करण्यात आली होती. आज त्याला कानपूरला नेलं जात असताना पोलिसांच्या गाडीला अपघात झाला. यानंतर विकास दुबेनं पोलिसांकडील बंदूक घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी झालेल्या चकमकीत विकास दुबे ठार झाला. यावरून राजकारण तापण्यास सुरुवात झाली असून समाजवादी पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी विकास दुबे एन्काऊंटरवरून सरकारवर निशाणा साधत ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे. "सरकार पलटी होऊ नये म्हणून कार पलटली" असं म्हणत योगी सरकारवर हल्लाबोल केला आहे. "कार पलटी झाल्यावर विकास दुबेने पळून जाण्याचा प्रयत्न केला हे स्पष्टीकरण संभ्रमात टाकणारे आहे. पळून जायचे होते तर त्याने स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन का केले?, कार पलटी झालेली नाही तर सरकार पलटी होण्यापासून वाचवण्यासाठी हा सर्व प्रकार घडवून आणला आहे" असा आरोप अखिलेश यादव यांनी केला आहे.
दरअसल ये कार नहीं पलटी है, राज़ खुलने से सरकार पलटने से बचाई गयी है.
— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) July 10, 2020
अखिलेख यादव यांनी गुरुवारीही ट्विट करुन अनेक प्रश्न उपस्थित केले होते. विकास दुबेला अटक करण्यात आली की, त्याने शरणागती पत्कारली याचा भांडाफोड होणं गरजेचं आहे. सरकारने याबाबत स्पष्टीकरण द्यावं, असेही अखिलेश यांनी म्हटलं होतं. तसेच, विकास दुबेच्या मोबाईलचे सीडीआर सार्वजनिक करणे गरजेचं आहे, त्यानंतर खऱ्या अर्थाने मिलिभगतचा भांडाफोड होईल, असे अखिलेश यांनी सांगितलं होतं. त्यानंतर आज देखील सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.