पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा
शिंधळेला कंठाहार .....
विठ्ठला अजब तुझे सरकार....!!!
"मी माऊलीला साकडं घातलं आहे. आता आम्हाला चमत्कार दाखव. मानवानं हात टेकलेत. आपल्याकडे काही औषध नाही. असं तोंडाला पट्टी लावून कुठवर जगायचं. संपूर्ण आयुष्य अडकून गेला आहे. या आषाढीपासून आम्हाला कोरोणाच्या संकटातून बाहेर काढ. संपूर्ण जगाला पुन्हा आनंदी, मोकळं जीवन जगायला मिळू दे. असं साकडं घातलं आहे, पंढरपूरच्या विठ्ठलाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी. खरंच राजकारणी लोक अजब आहेत, कारण जिथे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोरोनाच्या संकटापासून देशातील जनतेला वाचवण्याचा अहोरात्र व आटोकाट प्रयत्न करणाऱ्या जीवंत माणसांच्यावर यांचा विश्वास नाही, मात्र दगडा-धोंडयांच्या व मुर्त्यांवर यांचा अफाट विश्वास आहे. कीव वाटते, यांच्या बुद्धीची आणि अकलेची.....! देशावर व राज्यावर कोरोना महामारीच्या रूपाने भयंकर संकट आलेलं आहे. या संकटातून जनतेला वाचवण्यासाठी या देशातील व राज्यातील अनंत डॉक्टर्स, नर्स, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस व जनतेला अन्नधान्य पुरवणारे शेतकरी आपल्या जीवाची पर्वा न करता, दिवस-रात्र झटत आहेत. मात्र याच वेळी कोरोनाला देवआपल्या देव्हाऱ्यात स्वतःला बंदिस्त करून घेऊन गप्प बसले आहेत. त्यापैकी एक ही देव अशा अडचणीच्या वेळी जनतेची मदत करण्यासाठी समोर आला नाही. राम, कृष्ण, गणपती, साईबाबा, बालाजी, तुळजाभवानी, अंबाबाई, विठ्ठल, शनेश्वर इत्यादी पैकी एक ही देव किंवा देवी आपल्या भक्ताच्या रक्षणासाठी मदतीला आले नाहीत. यावेळी या सर्व रथी-महारथी देवांची दैवीशक्ती कुणाकडे गहाण ठेवली होती काय..?
सन 1995 मध्ये जेव्हा महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता आली होती. त्यावेळी मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले होते, तेव्हा तर त्यांनी चक्क गणपतीला दूध पाजले होते. आता हा सर्व देशाचा विघ्नहर्ता नेमक देशावर विघ्न आल्यावर कुठे लपून बसला की काय...? खरेतर केंद्रातील भाजपच्या सरकारला व महाराष्ट्रातील शिवसेनेच्या सरकारला कोरोना ग्रस्त जनता आता वाऱ्यावर सोडायची इच्छा झालेली दिसते. केंद्रातील भाजपच्या सरकारचे नेतृत्व करणारे पंतप्रधान, नरेंद्र मोदी यांनी तर कोरोना पासून देशातील जनतेला वाचवण्यासाठी उपाययोजना करण्याऐवजी स्पष्टपणे, 'आत्मनिर्भर व्हा ' म्हणून संदेश पाठवलेला आहे. दुसऱ्या कोणावर म्हणजेच सरकारवर सुद्धा अवलंबून राहू नका, जे काय असेल ते तुमचं तुम्ही बघा. तुम्ही कोरोनापासून वाचला तर तुमचे नशीब व देवांची कृपा, जर नाही वाचला तर तुम्ही देवाला फार आवडला, म्हणून देवाने तुम्हाला बोलावून घेतले आहे. अशा पद्धतीने जनता खुश आणि देव ही सहिसलामत राहिले की, देव आणि धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्याची पोळी आपोआप भाजली जाते. किती गंमतशीर बाब आहे, ज्या विठ्ठला पुढे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे यांनी,' कोरोना पासून महाराष्ट्रातील व देशातील जनतेला वाचव ' म्हणून मागणी केली आहे, तो विठ्ठल या अगोदर हताश होऊन आपले सर्व दरवाजे बंद करून घेऊन आत बसला होता. एवढेच नाही तर आषाढी वारी सारखी मोठी वारी असताना आपल्या भक्तांना किमान आपल्यापर्यंत येण्यासाठी ही मदत करायला विठोबा तयार नाही. मात्र जिथे देव, धर्म व संप्रदाय यांनी हताश होऊन हात टेकलेले आहेत, अशा ठिकाणी माणूसच डॉक्टर, वैद्यकीय सेवक, पोलिस, प्रशासन व शेतकऱ्यांच्या माध्यमातून दुसऱ्या माणसांच्या मदतीला धावून येत आहे व कोरोना पासून सर्वसामान्य माणसाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे देव, धर्म, दैववाद व नशीब इत्यादी खोट्या काल्पनिक गोष्टीवर अंधश्रद्धा ठेवून जनतेची सेवा करणारी माणसं, जर देशाच्या व राज्याच्या राजकारणामध्ये येत असतील तर, त्या देशातल्या जनतेने आपलं जीवन ' राम भरोसेचं' जगावे या कल्पनेच्या व अंधश्रद्धेच्या आधारावर जगणाऱ्या लोकांच्या कडून संकटाच्या वेळी खात्रीने उपाय योजना होईल व त्यातून आपण मुक्त होऊ अशी आशा सोडून द्यावी. कारण हे लोक म्हणजे पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा बांधणारे व शिंगोळे च्या गळ्यात सोन्याचा कंठहार घालणाऱ्या वृत्तीचे आहेत, असे म्हणावे लागेल. म्हणून कोरोनापासून स्वतःला, स्वतःच्या कुटुंबाला, राज्याला व देशाला वाचवण्यासाठी डॉक्टर जे उपाय सांगतात, त्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी व स्वतःसह सर्व देशवासीयांना कोरोना पासून मुक्त करण्यासाठी सहकार्य करावे, एवढीच अपेक्षा आहे.