सर्प दंश झालेल्या विद्यार्थाच्या पालकांना मदत : संग्रामसिंह देशमुख यांचा पाठपुरावा
माणदेश एक्सप्रेस न्युज
कडेगाव/प्रतिनिधी : खेराडे वांगी (ता.कडेगाव) येथील श्रीराम विद्यालयात इयत्ता दहावीत शिकणाऱ्या सौरभ सतिश निकम या विद्यार्थ्याचा दोन वर्षांपूर्वी सर्पदंशाने मृत्यू झाला होता. या विद्यार्थाच्या पालकांना शासकीय योजेनेचा लाभ मिळू शकला नव्हता. ही बाब लक्षात येताच सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख यांनी पाठपुरावा करून हा लाभ मिळवून दिला. मंगळवारी संग्राम देशमुख यांच्याच हस्ते मदतीचा धनादेश संबधित पालकांना देण्यात आला.
सौरभचे मूळ गाव नागेवाडी (ता.खानापूर) तो मामाच्या गावी शिक्षण घेत होता. सौरभला दुर्दैवाने सर्पदंश झाला, यामध्ये त्याच्या कुटुंबाचा भविष्याचा आधारच नियतीने हरवला, ही हानी कधीच भरून येणारी नाही, मात्र या कुटुंबाला एक लहानसा आधार म्हणून राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजने अंतर्गत अर्ज केला होता, मात्र काही कागदोपत्री अडचणी दाखवून हा प्रस्ताव गेल्या दोन वर्षांपासून अडगळीत पडला होता. संबंधित कुटुंबातील सदस्यांनी ही बाब निदर्शनास आणुन दिली, सर्व त्या कागदपत्रांचा वैयक्तिक पातळीवर पाठपुरावा करून मंगळवारी पालकांना ७५ हजार रुपयांचा धनादेश संग्राम देशमुख यांच्या हस्ते सुपूर्त केला.
यावेळी जि.प.माजी उपाध्यक्ष दत्तूशेठ सुर्यवंशी, जि.प.सदस्या सौ. रेश्माताई साळुंखे, कडेगाव पं.स. उपसभापती आशिष घार्गे, डॉ.जगताप, श्री. बाबर, सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी बोलताना संग्राम देशमुख म्हणाले, अशी दुर्दैवी वेळ कोणावरही येऊ नये पण दुर्दैवाने या कुटुंबावर ती वेळ आली आहे. मी केवळ माझे कर्तव्य पूर्ण केले आहे. ही मदत हे घर सावरू शकणार नसले तरी पालकांना एक लहानसा आधार मिळेल.