महिला आयोगाकडे 196 तक्रारी दाखल : लॉकडाऊन काळात महिला अत्याचार वाढला
मुंबई : राज्य महिला आयोगाकडे घरगुती हिंसाचाराच्या तक्रारी वाढल्या लॉकडाऊनच्या काळात राज्य महिला आयोगाकडे आतापर्यंत राज्यभरातून एकूण 196 तक्रारी ई-मेलच्या माध्यमातून प्राप्त झाल्या आहेत. यात औरंगाबाद विभागातून 17, अमरावती विभागातून 11, नाशिक 17, पुणे विभागातून 42 , कोकण विभागातून 34, नागपूर विभागातून 6 तर मुंबईतून 49 घरगुती हिंसाचाराच्या तक्रारी आहेत. तसेच राज्य महिला आयोगाकडे 20 अशा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, ज्यात जिल्हा किंवा विभागाचा उल्लेख करण्यात आलेला नाही.
राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव आस्था लुथरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, एरवी राज्य महिला आयोगाकडे दिवसाला 70 तक्रारी ई-मेल, पोस्ट किंवा प्रत्यक्ष येऊन दिल्या जात होत्या. मात्र, सध्याच्या परिस्थितीत पीडित महिलांना घराबाहेर पडणे मुश्किल झाल्याने पोस्टाद्वारे किंवा प्रत्यक्ष येऊन तक्रारी देण्याचे प्रमाण घटले आहे. राज्य महिला आयोगाकडून घरगुती हिंसाचाराला बळी पडलेल्या महिलांना तक्रार करण्यासाठी 1-1800-21-0980 हा हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला आहे. जो सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत सुरू असतो. या बरोबरच मोबाइल ॲपच्या माध्यमातूनही पीडित महिला तक्रार नोंदवू शकतात. पीडित महिलांवर होणाऱ्या घरगुती हिंसाचाराचा न्यायनिवाडा करण्यासाठी सध्या राज्य महिला आयोग पोलीस व काही एनजीओच्या मदतीने लॉकडाऊन काळात काम करीत आहे.