उत्तरप्रदेशचे लोक स्वगृही परत गेले : प्रा.कविता म्हेत्रे यांचा पुढाकार
माणदेश एक्सप्रेस न्युज
म्हसवड/अहमद मुल्ला : कोरोना लॉकडाऊन मुळे गेली दोन महिने म्हसवड येथे परप्रांतातील अनेक लोक अडकले ह्या अडकलेले परप्रांतीयांना त्यांच्या घरी सुखरूप पोहचण्यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या जिल्हाकार्याध्यक्षा प्रा.कविता म्हेत्रे यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे उत्तरप्रदेशचे 94 मजूर, कामगार स्वगृही परत गेले.
मजूर हे कमी शिकलेले, इंग्रजी वाचता येत नाही, गरिबीमुळे मोबाईल नाही, ऑनलाइन फॉर्म भरता येत नाही अशा अनेक मुद्द्यामुळे ऑनलाइन फॉर्म भरण्याची प्रक्रिया किचकट झाली होती ती प्रा.कविता म्हेत्रे यांनी शासन आणि प्रशासन यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनतर फॉर्म भरून देण्याची प्रक्रिया सुरू झाली. परप्रांतीय लोकांचे फॉर्म भरणे, फिटनेस सर्टिफिकेट काढणे, सर्व कागदपत्रे प्रशासनाकडे जमा करणे, ह्या प्रक्रिये बरोबर ह्या लोकांना दहिवडीला सोडणे, कारण ह्या लोकांना दहिवडी ते सातारा बसेस सोडणार आणि तिथून पुढे हे लोक रेल्वेने प्रवास करणार असे प्रशासनाने नियोजन केले होते.
परंतु दहिवडीची बस पकडण्यासाठी आदल्या दिवशी रात्रीच लोक म्हसवड ते दहिवडी 30 किमी पायी चालत जात होते. ही गोष्ट प्रा.कविता म्हेत्रे यांनी सातारा जिल्ह्याचे पालक मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या निदर्शनास आणून देताच त्यांनी माणच्या प्रांतअधिकारी यांना सूचना देऊन म्हसवड पासूनच उत्तर प्रदेशच्या लोकांना सातारा येथे घेऊन जाण्यासाठी बसेसची व्यवस्था केली.
यावेळी बोलताना प्रा.कविता म्हेत्रे म्हणाल्या की," महाविकास आघाडीच्या सरकारने आता पर्यंत 191 रेल्वे सोडल्या आहेत त्यातून अडीच लाख परप्रांतीय लोक आता पर्यंत स्वगृही परतले आहेत. त्यातील भाग म्हणून उत्तर प्रदेशचे लोक आपल्या जिल्ह्यातून त्यांच्या घरी जात आहेत. पालक मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केलेल्या सुचनांमुळे म्हसवड मधूनच सातारला जाण्यासाठी बसेस उपलब्ध झाल्या आणि ह्या गरीब मजूर व कामगारांचा त्रास टळला. याशिवायमाणच्या प्रांत, तहसीलदार सर्व प्रशासन, पोलीस प्रशासन, म्हसवड मधील सेवाभावी संस्था यांच्या सहकार्यामुळे हे शक्य झाले.
योगेश लोहार, विशाल जाधवर, अशोक कोके, सनी कवडे यांनी परप्रांतीयांना सहकार्य केले. जाताना ह्या लोकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. येणाऱ्या दिवसात परप्रांतीयांना सोडण्यासाठी झारखंड, छत्तीसगड, प.बंगाल येथे ही रेल्वेची सोय शासन करणार आहे.