मनसेच्या या माजी आमदाराची राजकीय निवृत्ती ; पत्नीला केले राजकीय वारसदार
माणदेश एक्सप्रेस ऑनलाईन टीम
आटपाडी : औरंगाबादमधील मनसेचे माजी आमदार व ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष हर्षवर्धन जाधव यांनी राजकारणातून निवृत्त होण्याची घोषणा केली आहे. फेसबुक पेजवरुन व्हिडीओ शेअर करीत त्यांनी आपली निवृत्तीची घोषणा केली. हर्षवर्धन जाधव मनसेचे माजी आमदार राहिलेले आहेत. पक्षांतर्गत नाराजीमुळे त्यांनी मनसे सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता. २०१९ च्या औरंगाबाद लोकसभेतून अपक्ष निवडणूक लढवत त्यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते घेतल्याने शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं.
लॉकडाऊन सुरु आहे, सर्वजण आपापले छंद जोपासत आहे. मीदेखील आध्यात्मिक वाचनाचा छंद जोपासला, आपण ज्या गोष्टींसाठी विनाकारण पळत राहतो त्या कितपत खऱ्या आहेत याची जाणीव मला झाली. त्यामुळे मी राजकारणातून निवृत्त होत असल्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या राजकारणाची उत्तराधिकारी म्हणून पत्नी संजना जाधव यांची निवड केली आहे. प्रत्येक घरात कुरघोडी होत असतात, आमच्याही घरात झाल्या, पण याचा अर्थ असा नाही की वेगळ्या गोष्टी घडत असतील. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वात संजना जाधव निश्चित चांगल्याप्रकारे काम करेल, यापुढे काही सामाजिक, राजकीय, शासकीय मदतीसाठी संजना जाधव यांच्याशी थेट संपर्क साधावा, मीदेखील खंबीरपणे संजनाच्या पाठिशी उभा आहे. हर्षवर्धन जाधव हे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत.