माणदेश एक्सप्रेस न्यूज
आटपाडी प्रतिनिधी : समाज्याच्या भल्यासाठी जीव धोक्यात घालून सतत कार्यरत राहणारे पत्रकार , संपादक हे समाजाचे खरेखुरे सेवक असून पत्रकारांना संसद , विधीमंडळ , सहकार , स्थानीक स्वराज्य संस्था आणि सर्वच प्रकारच्या धर्मादाय ट्रस्ट , संस्थामध्ये प्रतिनिधीत्व करता यावे म्हणून ५ टक्के राजकीय आरक्षण देशभर दिले जावे अशी मागणी ज्येष्ठ पत्रकार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारणी सदस्य सादिक खाटीक यांनी केली आहे .
पत्रकार दिनाच्या पार्श्वभूमीवर विविध दैनिकांशी बोलताना सादिक खाटीक यांनी या महत्वपूर्ण मागणीचा उहापोह केला ,पत्रकारांना विविध क्षेत्रात राजकीय आरक्षण दिले जावे यासाठी आणि अन्य मागण्यांसाठी आपण मध्यवर्ती सरकार आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा चालविला असून या महत्वपूर्ण मागणीसाठी देशभरातील प्रिंट मिडीया , इलेक्ट्रॉनिक मिडीयातील संपादक , पत्रकार यांनी जोरदार आवाज उठवून हे आरक्षण मिळण्यासाठी निकाराची भूमिका पार पाडावी असे आवाहन सादिक खाटीक यांनी केले आहे .
देशाच्या स्वातंत्र लढयाबरोबर अनेक महत्त्वपूर्ण लढयामध्ये , आंदोलनामध्ये पत्रकारांनी मोलाची भूमिका बजावली आहे . समाजातील विघातक, गुन्हेगारी वृतीच्या शक्ती विरुद्ध लढताना अनेक पत्रकारांना आपला जीव गमवावा लागला आहे , अनेक लढयांमध्ये शेकडो पत्रकार जायबंदी झाले आहेत .हजारोंनी लाठ्या काठ्यांचा मार खाल्ला आहे , हजारोंनी तुरूंगवास ही भोगला आहे .समाजाचा आरसा असणारे पत्रकार नेहमीच समाजाचे डोळे, कान बनून डोळसपणे काम करीत आले आहेत . पत्रकाराना राजकीय आरक्षण दिले गेल्यास लोकशाहीच्या मजबूतीचे मोठे पारदर्शक काम होवू शकेल . भ्रष्ट संस्था , आणि संस्था चालक, शासनकर्त्यांवर ही या जागल्याचा अंकूश राहू शकेल .
ग्रामपंचायती , पंचायत समिती , जिल्हा परिषदा , नगरपंचायती , नगरपालीका , महानगरपालीका , सहकार क्षेत्रातील साखर कारखाने , सुतगिरण्या , दुध संघ , बँका वगैरे सर्वच संस्था , धार्मीक ट्रस्ट , धर्मादाय संस्था ट्रस्ट , विधिमंडळ , संसद या ठिकाणी पत्रकारांना आरक्षण देण्याने या संस्थाचा कारभार चोखपणे होण्यास मोठी चालना मिळू शकेल . अनेक ठिकाणच्या भ्रष्टाचाराला आळा बसेल आणि विकासाला चौफेर गती मिळेल .
किमान २५ वर्षे पत्रकारीता करणाऱ्या पत्रकाराला अशा आरक्षणासाठी पात्रतेचा निकष लावला जावा . पात्र पत्रकाराला वयाच्या साठी नंतर राज्य कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या पेन्शन प्रमाणे पेन्शनचा लाभ दिला जावा .पत्रकाराच्या संपूर्ण कुटूंबाला १० लाख रुपये पर्यतच्या आरोग्य सुविधांचा लाभ दिला जावा, आणि पत्रकारांच्या कुटूंबातील सर्वाना विम्याचे संरक्षण दिले जावे अशा मागण्याही यावेळी सादिक खाटीक यांनी केल्या .
पत्रकारांना राजकीय आरक्षण देणारा निर्णय महाराष्ट्र सरकारने सर्वप्रथम करून देशापुढे नवा आदर्श निर्माण करावा. आणि हा कायदा देशभर अस्तित्वात यावा यासाठी राष्ट्रीय नेते खासदार शरदचंद्रजी पवार , मुख्यमंत्री ना . उध्दवजी ठाकरे , उपमुख्यमंत्री ना . अजितदादा पवार , राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष , जलसंपदामंत्री ना . जयंतराव पाटील , काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष , महसुल मंत्री ना . बाळासाहेब थोरात , खासदार आणि दै . सामनाचे संपादक संजय राऊत , खासदार सुप्रियाताई सुळे , माजी मंत्री विलासराव मुत्तेमवार , दै . पुढारीचे संपादक प्रतापसिंह जाधव , खासदार हुसेन दलवाई , खासदार कुमार केतकर , खासदार भारतकुमार राऊत ,माजी खासदार विजयराव दर्डा , माजी मंत्री राजेंद्र दर्डा , एबीपी माझा मराठी न्यूज चॅनेलचे संपादक राजीव खांडेकर ,यांच्यासह अनेक मान्यवर संपादक , पत्रकार , राजकीय , सामाजीक नेत्यांनी तसेच राज्यातील , देशातील सर्वच पत्रकार संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन सादिक खाटीक यांनी केले आहे .