माळशिरस प्रतिनिधी
संजय हुलगे : ता. माळशिरस मांडवे येथील रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय किसान दिनाच्या निमित्ताने आनंद बाजार दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घघाटन पंचायत समितीच्या सभापती वैष्णवीदेवी मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड. दिलीप फडे होते. याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनंतलाल दादा दोशी, सन्मती सेवा दलाचे संस्थापक मिहीर गांधी, बाबुभाई दोशी, अभय काका दोशी, श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक रामदास कर्णे, पुरंदवड्याचे सरपंच देविदास ढोपे, रत्नत्रय पतसंस्थेचे चेअरमन विरकुमार दोशी, प्रशाला कमिटीचे चेअरमन प्रमोद दोशी, ॲड. शिवाजी मदने, तुषार गांधी, अभिजीत दोभडा , सुरेश कुलकर्णी, शशिकांत दोशी, अभिजित दोशी, प्रशांत दोशी, संजय गांधी, ज्ञानेश राऊत, शहाजी देशमुख शिवाजीराव निंबाळकर, पुनम दोशी, पार्वती जाधव मुख्याध्यापक दैवत वाघमोडे व समीर देशपांडे, पर्यवेक्षक सतीश हांगे सर्व विभागाचे विभाग प्रमुख शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना वैष्णवीदेवी मोहिते-पाटील म्हणाल्या " शिक्षण क्षेत्रामध्ये झपाट्याने बदल होत आहेत. आजच्या विज्ञान युगामध्ये विविध उपक्रमांमधून शिक्षण देऊन विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार विचारांची देवाण-घेवाण करून भविष्य घडविण्याची जबाबदारी आहे. आज रत्नत्रय शैक्षणिक संकुलात हा उपक्रम राबविल्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होणार आहे." कार्यक्रमाचे अध्यक्ष दिलीप फडे म्हणाले "विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच प्रत्यक्ष ज्ञान त्यामुळे विद्यार्थ्यांच्या व्यवहार ज्ञानामध्ये निश्चित भर पडणार आहे." तर अनंतलाल दादा दोशी म्हणाले " विद्यार्थ्यांच्या सार्वजनिक विकासासाठी संस्थेमध्ये नेहमीच निरनिराळे व नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असतो त्या अनुषंगाने आज व्यवहारज्ञान समजण्यासाठी बाजार दिवस हा उपक्रम राबविण्यात आलेला आहे"या बाजारात एकूण तीनशे दहा विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन 176 दुकाने लावली होती .यामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या शेतातील गवार, वांगी, टोमॅटो, कांदा, पातीचा कांदा, कोथिंबीर, मिरची, पालक, मेथी, काकडी, विविध पालेभाज्या, तसेच पेरू, डाळिंब, केळी ,सीताफळ, स्ट्रॉबेरी आदी फळांचे स्टॉल होते तर काही विद्यार्थ्यांनी खमंग ढोकळा, पाणीपुरी, पावभाजी ,भेळ वडापाव इत्यादीचे स्टॉल लावले होते. बाजार दिवसाचे खास वैशिष्ट्य म्हणजे या बाजारात रास्त भावामध्ये विक्रीस उपलब्ध असलेला कांदा, प्रशालेतील नेमलेले पोलीस पथक, प्लास्टिक मुक्त बाजार, विभागवार माल विक्रीस बसलेले बाल शेतकरी हे होय.
या बाजाराचा लाभ परिसरातील किरकोळ व्यापारी, दुकानदार ,शेतकरी, घाऊक व्यापारी यांना झाला. प्रत्येक विद्यार्थ्यांनी स्वतः चौकशी करून माहिती घेऊन मालाची खरेदी केली. या बाजारामुळे परिसरातील दुकानदार व व्यापारी यांच्या विक्रीमध्ये वाढ झाल्याची माहिती दुकानदार व व्यापाऱ्यांनी दिली. विद्यार्थ्यांनी आनंद बाजाराच्या माध्यमातून रोजच्या जगण्यातील बाजार व व्यावहारिक ज्ञान याचा अनुभव घेतला विद्यार्थ्यांच्या अंदाजानुसार सुमारे चार तासात सुमारे दोन लाख 26 हजार रुपयांची उलाढाल झाली.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रमोद भैय्या दोशी सूत्रसंचालन मंगेश केकडे सर तर आभार प्रदर्शन वीरकुमार दोशी यांनी केले.