माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : जीवापाड प्रेम करणाऱ्या कार्यकर्ते आणि जनतेच्या पाठबळावरच आपण यशस्वी झाल्याचे मानणाऱ्या मंत्री जयंतराव पाटील यांनी त्यांच्या सत्कारासाठी आलेल्या रावसाहेब पाटील या वडिलांच्या कार्यकर्त्याचे कौतूक करत चक्क पेढा भरवून त्याची प्रचिती देत सुखद धक्का दिला .
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, राज्याचे कॅबिनेट मंत्री ना .जयंतराव पाटील हे मंत्री झाल्यानंतर प्रथमतःच सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते . इस्लामपूर येथे त्यांचा सत्कार आणि अभिनंदन करण्यासाठी हजारो कार्यकर्ते, हितचिंतक यांनी प्रचंड गर्दी केली होती.मंत्री पाटील यांचा सत्कार करण्यासाठी आटपाडी तालुक्याचे जेष्ट नेते रावसाहेबकाका पाटील हे आपल्या कार्यकर्त्यासह कारखाना कार्यस्थळावर गेले होते . गर्दीतून वाट काढत मंत्री जयंतरावांच्या जवळ पोहोचलेल्या रावसाहेबकाका पाटील यांचा सत्कार स्विकारण्याऐवजी रावसाहेबांच्या तोंडात पेढा भरवून आपले आजवरचे यश कार्यकर्त्यामुळेच असल्याचे अप्रत्यक्षरित्या सुचित करीत जयंतरावनी सर्वांनाच सुखद धक्का दिला.
मंत्री पाटील यांच्या या प्रेमळ कृतीने रावसाहेबांबरोबर इस्लामपूरला गेलेल्या कार्यकर्त्यांना आश्चर्याचा धक्का तर दिलाच तथापि या कृतीतून जयंतरावनी काही सुचक इशारा तर दिला नाही ना ? लोकनेते राजारामबापुंच्या काळापासून आज अखेर आटपाडी तालुक्याला सत्तेच्या पदाची संधी मिळाली नाही, ही सल जयंतराव यावेळी दूर करून रावसाहेबांच्या रूपाने आटपाडीचे आमदारकीचे, महामंडळ अध्यक्ष पदाचे स्वप्न साकारतील काय ! अशीच भावना कार्यकर्त्यांची नामदार साहेबांच्या कृतीने वाढीस लागली आहे.