माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : दि.आटपाडी एज्युकेशन सोसायटीच्या वर्धापन दिनानिमित्त श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालय, आटपाडी यांनी सामाजिक बांधिलकी जपत महाविद्यालय परिसरामध्ये स्वच्छता मोहीम राबविली. १२ डिसेंबर १९५३ साली कै. श्रीमंत बाबासाहेब देशमुख यांनी आटपाडी सारख्या ग्रामीण भागामध्ये शिक्षण संस्थेची स्थापना केली. या शिक्षण संस्थेला ६६ वर्ष पूर्ण होत आहेत.
महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी यांनी महाविद्यालय परिसर व दिघंची-आटपाडी रोडचा वीज बोर्ड ते महाविद्यालय पर्यंतचा रस्ता दुतर्फा स्वच्छ केला. आटपाडी एज्युकेशन सोसायटीची स्थापना १२ डिसेंबर १९५३ रोजी श्रीमंत बाबासाहेब देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरू केली. आज या संस्थेचा वटवृक्ष झालेला आहे. शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात संस्थेने नेहमीच उल्लेखनीय यश प्राप्त केले आहे. पूर्वी संस्था वर्धापनदिनानिमित्त गावांमध्ये प्रभातफेऱ्या काढल्या जायच्या, मात्र संस्थेचे चेअरमन अमरसिंहबापू देशमुख यांनी समाजाभिमुख काम करावे असा मानस व्यक्त केला. त्यामुळे संस्थेच्या विविध शाखांमध्ये समाजाभिमुख विविध उपक्रम राबवले जातात. त्यातीलच एक उपक्रम म्हणजे गावांची स्वच्छता मोहीम. या स्वच्छता मोहिमेमध्ये श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयाने स्वच्छता मोहीम हाती घेतली व महाविद्यालय परिसर तसेच मुख्य रस्ता यांची स्वच्छता केली. समाजातील विविध स्तरातून या उपक्रमाचे व संस्थेचे कौतुक होत आहे. महाविद्यालयाने ११ व १२ डिसेंबर या दोन दिवशी स्वच्छता मोहीम तसेच संस्था वर्धापनदिनाचे आयोजन केले आहे. १२ डिसेंबर रोजी संस्था वर्धापन दिनानिमित्त महाविद्यालयामध्ये कार्यक्रम आयोजित केला आहे. याबरोबरच श्रीमंत बाबासाहेब देशमुख व्याख्यानमाला व विविध स्पर्धांचेही आयोजनही करण्यात आले आहे.स्वच्छता मोहिमेमध्ये महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. विजय लोंढे यांनी सहभाग घेवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, एन.सी.सी.कॅडेटस, राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवक, विद्यार्थी-विद्यार्थिनी, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी व सहाय्यक कार्यक्रम अधिकारी यांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला.