हैदराबाद : विराट कोहलीच्या तुफानी फटकेबाजीच्या जोरावर भारताने पहिल्या २०-२० सामन्यात वेस्ट इंडिजवर सहज विजय मिळवला. विराटला यावेळी अर्धशतकवीर लोकेश राहुलची चांगली साथ मिळाली. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. आता दुसरा सामना १० डिसेंबरला होणार आहे. भारताने या सामन्यात सहा विकेट्स राखून विजय मिळवला. कोहलीने या विजयात सिंहाचा वाटा उचलला. कोहलीने ५० चेंडूंत सहा चौकार आणि सहा षटकारांच्या जोरावर नाबाद ९४ धावांची तुफानी खेळी साकारली.
वेस्ट इंडिजच्या २०८ धावांचा पाठलाग करताना रोहित शर्माच्या रुपात भारताला लवकर धक्का बसला. पण त्यानंतर राहुल आणि कर्णधार विराट कोहली यांनी अर्धशतकी भागीदारी रचत संघाचा डाव सावरला. कोहलीपेक्षा अधिक आक्रमक फलंदाजी करत असल्याचे पाहायला मिळाले.राहुलने यावेळी २०-२० क्रिकेटमधील हजार धावा पूर्ण केल्या. २०-२० क्रिकेटमधील हजार धावा पूर्ण करणाला तो भारताचा सातवा खेळाडू ठरला. पण अर्धशतक झळकावल्यावर राहुलला जास्त काळ फलंदाजी करता आली नाही. राहुलने ४० चेंडूंत ५ चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर ६२ धावा केल्या.
राहुल बाद झाल्यावर कोहली अधिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. कोहलीने यावेळी षटकार ठोकत अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर कोहलीने वेस्ट इंडिजच्या गोलंदाजीवर जोरदार हल्ले चढवले. वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना झंझावाती फलंदाजी करत पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारतापुढे 208 धावांचे आव्हान ठेवले होते.
भारताने नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. वेस्ट इंडिजचा सलामीवीर इव्हिन लुईसने तुफानी फटकेबाजी करत फक्त १७ चेंडूंमध्ये ४० धावांची लूट केली. त्याला फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरने बाद केले. लुईसनंतर वेस्ट इंडिजचा शिमरोन हेटमायर चांगलाच तळपला. हेटमायरने षटकारासह आपले अर्धशतक दिमाखात साजरे केले. हेटमारने ४१ चेंडूंत २ चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर ५६ धावा केल्या हेटमायर बाद झाल्यावर एका चेंडूनंतर किरॉन पोलार्डही ३७ धावांवर बाद झाला. भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने हे दोन्ही बळी मिळवून दिले.