माणदेश एक्सप्रेस न्युज
विटा/प्रतिनिधी : मातंग समाजातील नेत्यांना मंदिर कमिटीची नव्हे तर शिक्षण कमिटीची आवश्यकता आहे अशी मागणी तुषार ठोंबरे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
गेल्या अनेक वर्षापासून सुरु असलेल्या राम जन्मभूमी बाबरी मशीद वादाचा निकाल नुकताच झाला असून सर्वच भारतीय नागरिकांना त्याचा अभिमान आहे. मातंग समाजाचे माजी समाजकल्याण मंत्री व भाजपचे नेते दिलीप कांबळे यांची नुकतीच रामजन्मभूमी मंदिर समितीच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड झाली. सदरची निवड दिलीप कांबळे यांचे करीता अभिमानाची असली तरी त्यांच्या निवडीने समाज बांधवांना कोणताही लाभ होणार नाही. मातंग समाज आजही आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक प्रश्नाबाबत चाचपडत आहे. मंत्रिपदाच्या काळात मातंग समाजाचे शिक्षण, आरक्षण, संरक्षण आदी प्रश्न सोडवण्यात मंत्रीमहोदय सपशेल अपयशी ठरले. त्यामुळेच त्यांची मंत्रिपदावरून हाकालपट्टी केली तसेच पुन्हा तिकीट देखील दिले नाही हे सर्वश्रुत आहे.राम मंदिर समितीच्या उपाध्यक्षपदी निवड करून भाजप सरकारने आपला जातीयवादी चेहरा लपवण्याचा केविलवाणा प्रकार केला असून मातंग समाजाच्या नेत्याला मंदिर कमिटीच्या उपाध्यक्षपदी करण्यापेक्षा विद्यापीठ अनुदान आयोगाचे किंवा केंद्रीय शिक्षण समितीचे अध्यक्षपद दिले असते तर समाजातील अनेक तरुणांच्या शैक्षणिक प्रश्नांची निवारण शक्य झाले असते असे तुषार ठोंबरे म्हणाले.