माणदेश एक्सप्रेस न्युज
अकलूज/प्रतिनिधी : भाजपचे माजी मुख्यमंत्री व सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व विनोद तावडे यांनी अजितदादा पवार यांची जाहीर माफी मागावी अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी उपविभागीय अधिकारी अकलूज यांना दिले आहे. यावेळी जि.प. सदस्य बाळासाहेब धाइंजे, जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर इंगळे-देशमुख, जिल्हा संघटक मदन देशमुख, माळशिरस तालुकाध्यक्ष माणिक वाघमोडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस पिनू येडगे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बाबा जाधव, ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष सोमनाथ पिसे, बहुजन ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष पिंटू एकतपुरे, बंडू कांबळे, सोमनाथ शेळके उपस्थित होते.
भाजपचे माजी मुख्यमंत्री व सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादा पवार यांच्यावर ७० हजार कोटी रुपयांचा सिंचन घोटाळा केल्याचा आरोप केला होता. त्या आरोपामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे चौकशी दरम्यान सिध्द झाले आहे. त्यामुळे बिनबुडाचे आरोप हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर व अजितदादा पवार यांच्यावरती करण्यात आले होते. त्या पाठीमागचा भाजपचा उद्देश हा राष्ट्रवादी काँग्रेसला व अजितदादा पवार यांना बदनाम करण्याचा होता, हे सिध्द झाले आहे.अजितदादा पवार यांना बदनाम करण्याचे काम देवेंद्र फडणवीस व विनोद तावडे यांनी केले आहे. वारंवार ७० हजार कोटी रुपयांचा सिंचन घोटाळा अजितदादा पवार यांनी जलसंपदा मंत्री असताना केल्याचा आरोप या दोघांनी केलेला होता. त्यांनी केलेला सिंचन घोटाळ्याचा आरोप चौकशी अंती खोटा ठरला असून हा आरोप राजकीय आकसापोटी केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याबद्दल देवेंद्र फडणवीस व विनोद तावडे यांचा निवेदनाद्वारे जाहीर निषेध करून बिनबुडाचे आरोप केल्याप्रकरणी या दोघांनी व भाजपने अजितदादा पवार यांची जाहीर माफी मागावी, अन्यथा विरोधी पक्षनेते असलेले देवेंद्र फडणवीस यांना व विनोद तावडे यांना सोलापूर जिल्ह्यामध्ये फिरू देणार नसल्याचा इशारा किरण साठे यांनी दिला आहे.