माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रशांत केंगार : राज्यघटनेबाबत नागरिकांना जास्तीत जास्त माहिती व्हावी. राज्यघटनेचे विविध पैलू लोकांसमोर यावेत. या उद्देशाने आटपाडीत शाहू-फुले-आंबेडकर विचारमंच्याकडून प्रतिवर्षी 20 ते 26 नोहेंबर दरम्यान संविधान जनजागृती सप्ताह आयोजित केला जातो. सप्ताहाअंतर्गत प्रबोधनात्मक व्याख्यान मालेचे आयोजन केले जाते. नूकतेच 20 नोहेंबरला डॉ.श्यामसुंदर मिरजकर यांचे हस्ते व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफण्यात आले. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून बोलताना श्यामसुंदर मिरजकर म्हणाले, संविधानाने स्वातंत्र्य,समता,बंधुता तत्वानुसार सर्वांना समान अधिकार व कर्तव्ये दिली. लोकहिताच्या दृष्टीने काही मूलभूत तत्वे तयार व्हावीत. त्या तत्वानुसार विधिनियमाचे पालन व्हावे. यासाठी सर्वांगीण कायदा चौकट म्हणून संविधान निर्मिती केली आहे. भारताचे संविधान हे भारताचे सर्वोच्च, पायाभूत धर्मनिरपेक्ष असा दृढ कायदा आहे. डॉ.मिरजकर यांनी आपल्या क्रांतिकारी विचारांनी व्याख्यान मालेत पहिले विचारपुष्प गुंफताना त्यांनी संविधानातील विविध गोष्टींवर प्रकाश टाकला
पुढे बोलताना डॉ. मिरजकर म्हणाले, स्वतःला पंडित म्हणविणाऱ्यानी समाजात वर्णव्यवस्था उभी केली. सामाजिक नीतिनियमांची अनैसर्गिक विभागणी करून सर्वसमान्याचे शोषण केले आहे. देशातील विषमतावादी या व्यवस्थेला उलथवून टाकण्यासाठी फ्रेंच राज्यक्रांतीच्या तत्वांनी आशादायक स्थिती निर्माण केली. दीर्घकाळ खितपत पडलेल्या व शोषित समाजाला स्वातंत्र्यमुक्ती देण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी फ्रेंच क्रांतीच्या स्वातंत्र्य, समता, बंधुता पुरस्कार केला. जगातील विकसित देशांच्या राज्यघटनाचा अभ्यास करून सर्वसमावेशक संविधान निर्मिती केली आहे. सर्व विषमतावाद संपुष्टात आणण्यासाठी संविधानात्मक कायदा निर्मिती केली. सर्वाना समान हक्क,अधिकार दिले. भारतीय संविधान हे सर्व नागरिकांना परिवर्तनातून भवितव्य घडवून देणारी क्रांतीज्योत आहे. संविधान हा लोकशाहीचा गाभा आहे. आपले संविधान हे सत्तेला दिलेली सनद आहे.तर प्रमुख पाहुणे सहाय्यक आयकर आयुक्त मुंबई सचिन मोटे म्हणाले, देशाचे संविधानाबाबत जनजागृती करणे. राज्यघटनेतील विविध बाबींची लोकांना महिती व्हावी. यासाठी येथील शाहू-फुले-आंबेडकर विचारमंच कार्यरत आहे. त्यांचे प्रबोधन कार्य कौतुकास्पद आहे. भविष्यात ही असेच कार्य चालू ठेवावे.
यावेळी विचारमंच अध्यक्ष राजेंद्र खरात, सचिन मोटे, ॲड. धनंजय पाटील, रणजित ऐवळे, सुरेश मोटे, सनी पाटील, बाळासाहेब मेटकरी, दीपक खरात, लक्ष्मण मोटे, प्रकाश मरगळे आदी प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक राजेंद्र खरात, सूत्रसंचालन सुरेश मोटे, आभार रणजित ऐवळे यांनी मानले. कार्यक्रमासाठी भोजन सहकार्य श्यामराव पवार यांनी केले.
आमच्या दैनिक माणदेश एक्सप्रेस whatsapp group मध्ये join होण्यासाठी click करा.