माणदेश एक्सप्रेस न्युज
खरसुंडी/वार्ताहर : मागील चार दिवसांपासून वातावरण सातत्याने बदलत आहे. कधी थंडी तर कधी कोरड्या वाऱ्यांमुळे विविध आजारांनी डोके वर काढले आहे. व्हायरल फीवर आणि सर्दी-खोकल्याच्या तक्रारी वाढल्या असतानाच साथीचे आजारही वाढत आहेत. घरोघरी सर्दी, खोकला व तापाचे रूग्ण आढळून येत आहे. परिणामी, शासकीय रूग्णालयांसह खासगी दवाखानेही फुल्ल झाले आहेत.
वातावरणात सतत बदल होत असताना प्रत्येक व्यक्तीच्या शरीराला या वातावरणात जुळवून घेणे सहज शक्य होत नाही. लहान बालके, वृद्ध व रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्तींना आजाराची लवकर लागण होते. सायंकाळनंतर खूप थंडी व दिवसा काहीसा उकाडा, अशा वातावरणातमुळे साथीचे आजार बळावत असल्याचे दिसून येत आहे. वातावरणातील बदलामुळे विषाणूजन्य आजारांतही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहावयासस मिळते.आधीच श्वसनाचे विकार असणाऱ्या व्यक्तींना या वातावरणाचा अधिक त्रास होतो. गावागावातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र व खासगी दवाखाने रुग्णांच्या संख्येमुळे खच्चून भरल्याचे दिसून येत आहे. सर्दी-पडसा, खोकला व त्यामुळे आलेल्या तापावर वेळीच उपचार न केल्यास ताप वारंवार येतो. परिणामी, अनेकदा रूग्णांना जीवही गमवावा लागतो. यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे झाले आहे. यासाठी आरोग्याप्रती जनजागृती करणे गरजेचे झाले आहे.