माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : शेतकऱ्यांच्या, शेतमजुराच्या मुलींच्या सामुहिक विवाहासाठी शुभ मंगल सामुहिक विवाह योजना राबविण्यात येत आहे. सांगली जिल्हयातील गरीब शेतकरी, शेतमजूर यांनी मुलीच्या विवाहाकरीता या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुवर्णा पवार यांनी केले आहे.
सुवर्णा पवार म्हणाल्या, या योजनेंतर्गत शेतकरी / शेतमजूर कुटूंबातील मुलीच्या विवाहासाठी आवश्यक असलेल्या मंगळसुत्र व इतर वस्तूची खरेदी करण्यासाठी प्रती जोडपी दहा हजार रूपये अनुदान वधूच्या आईच्या नावाने देण्यात येते व सामुहीक विवाहाचे आयोजन करणाऱ्या संस्थेस दोन हजार रूपये प्रोत्साहनात्मक अनुदान विवाहाचे आयोजन विवाह समारंभाचा खर्च भागविण्यासाठी देण्यात येतो.या योजनेच्या अटी व शर्ती पुढीलप्रमाणे - या योजनेचा लाभ शेतकरी व शेतमजूर कुटूंबातील मुलीच्या विवाहासाठी राहील. वधू ही महाराष्ट्रातील संबधित जिल्ह्याची स्थानिक अधिवासी असावी. विवाह सोहळ्याच्या दिनांकास वराचे वय 21 वर्ष व वधूचे वय 18 वर्ष यापेक्षा कमी असू नये. तलाठी / तहसिलदार यांनी दिलेला 1 लाखाच्या आतील वार्षिक उत्पन्नाचा दाखला. या योजनेंतर्गत जे जोडपे सामुहिक विवाह सोहळ्यात सामील न होता सरळ विवाह नोंदणी कार्यालयामध्ये जावून विवाह करतील त्यांनाही रूपये दहा हजार देण्यात येईल. वधू विधवा किंवा घटस्फोटात असल्यास तिच्या पुनर्विवाहासाठी अनुज्ञेय राहील. वधू व वर यांनी विवाहाचा पुरावा म्हणून विवाह नोंदणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील. स्वयंसेवी संस्थेमार्फत आयोजित केलेल्या सामुहिक विवाह सोहळ्याच्या किमान एक महिना अगोदर जिल्हा महिला बाल विकास अधिकारी, सांगली यांच्या कार्यालयास अर्जासह सर्व एकत्रित दाखले सादर करावेत. अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्गासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग तसेच आदिवासी विकास विभागामार्फत स्वतंत्र योजना राबविण्यात येत असल्यामुळे या प्रवर्गातील दांपत्ये या योजनेअंतर्गत अनुदानासाठी पात्र राहणार नाहीत.
दैनिक माणदेश एक्सप्रेस Whats App Group मध्ये Join होण्यासाठी Click करा.