माणदेश एक्सप्रेस न्युज
पलूस/प्रतिनिधी : बिरसा क्रांती दल पलूस यांच्या वतीने वतीने आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे व बिरसा मुंडा यांची संयुक्त जयंती पलूस येथे उत्साहात पार पडली. त्यावेळी बिरसा क्रांती दलाचे पुणे विभागीय अध्यक्ष दिलीप आंबवणे हे प्रमुख वक्ते होते.
त्यावेळी आंबवणे म्हणाले, महामानव बिरसा मुंडा यांना पंचवीस वर्ष आयुष्य लाभले त्या काळात बिरसा मुंडा यांनी जल, जंगल, जमीन यासाठी उलगुलान म्हणजे आंदोलन पुकारले. इंग्रजांच्या विरोधात आंदोलनाची लढाई सुरू केली. त्या आंदोलनाची प्रचिती म्हणजेच आज आदिवासीं समाजाकडे जमिनी शिल्लक आहेत. आदिवासींच्या जमिनी ह्या बिगरआदिवासी व्यक्तींच्या नावे होऊ शकत नाहीत. आठराशे काळामध्ये बिरसा मुंडा यांच्या जमीन आंदोलनामुळे इंग्रजांनी भूमि अधिग्रहण कायदा निर्माण केला. त्याचा फायदा आजही आदिवासींना मिळत आहे. त्यांचा जन्म झारखंड राज्यात झाला पण देशभर व महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात त्यांची जयंती साजरी करण्यात आली.आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे त्यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील देवगाव येथे झाला त्यांनी सह्याद्रीच्या रांगेमध्ये बंड पुकारले. सावकारांना सळो कि पळो करून सोडले, अनेक सावकार हे आदिवासी लोकांना त्रास देत असत, जमिनी लाटत असत. मात्र ज्या-ज्या ठिकाणी आदिवासी माणसाला त्रास दिला आहे. तेथे उमाजी गेंगजे, सतू मराडे, भागू यंदा, होनाजी केंगले, रामा किर्वे, कोंड्या नवले या साथीदारांच्या सोबत राघोजी भांगरे हे सावकारांचे मुंडकी कापून टाकत असत. त्यावेळी सावकारीला आळा बसला. क्रांतिकारकांचा इतिहास ज्या समाजाला माहीत होत नाही तो समाज कधीही क्रांती करू शकत नाही असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले आहे त्यामुळे आदिवासींचा इतिहास समाजापर्यंत पोचवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे असे मत आंबवणे यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी बिरसा क्रांती दल पलुस तालुका अध्यक्ष पुनाजी साबळे, कैलास मडके, गुलाब भोईर, एस.एम. ठाकरे, रंगनाथ बंगाल, अनुजा शेळके, लता शेळके, विश्वनाथ वाळकोळी आदी उपस्थित होते.
दैनिक माणदेश एक्सप्रेस Whats App Group मध्ये Join होण्यासाठी Click करा.