आटपाडी/प्रतिनिधी : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या मंत्रिमंडळात खानापूर विधानसभा मतदार संघातील आमदार अनिलभाऊ बाबर यांना मंत्रिपद मिळावे याची प्रतीक्षा आटपाडी, खानापूर तालुका व विसापूर मंडल मधील जनतेला लागून राहिली आहे. सर्वांचे लक्ष मुंबई सत्तास्थापनेसाठी सुरू असलेल्या राजकीय हालचालीकडे लागले आहे.
सांगली जिल्ह्यात एकमेव खानापूर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर आमदार अनिल बाबर विजय झाले. भाजप व शिवसेनेची युती होती. आटपाडी तालुक्यातील भाजप-शिवसेनेच्या नेते व कार्यकर्त्यांनी निवडणुकीसाठी आपले राजकीय मतभेद विसरून एकत्र येऊन अनिल बाबर यांना आटपाडी तालुक्यातून भरघोस मतांनी निवडून दिले.आमदार अनिल बाबर यांच्या माध्यमातून दुष्काळी भागाला शिवसेना न्याय देईल असा अशा विधानसभा निवडणुकीपासून जनतेला वाटत आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्याकरिता खानापूर तालुक्यातीची निवड केली. आमदार बाबर यांच्या निवडणुकीसाठी शिवसेनेचे युवाअध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी सभा घेऊन मला विधानसभेचे आमदार बाबर यांच्या मार्गदर्शनाची गरज आहे असे बोलून दाखवले. केवळ आमदार अनिल बाबर यांच्यामुळे निवडणुकीसाठी उभे राहिलो असे आदित्य ठाकरे यांनी जाहीर सभेत सांगितले. मी आमदार अनिल बाबर यांच्या प्रचारासाठी आलो नाही तर शिवसेनेच्या वाढीसाठी व प्रचारासाठी आलो आहे असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात आमदार अनिल बाबर यांचा समावेश होईल अशी आशा सर्वांना लागून राहिली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस सत्ता स्थापनेच्या दाव्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होणार असल्यामुळे आटपाडीतील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फटाके उडवून आनंद व्यक्त केला. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात आमदार अनिल बाबर यांचा समावेश व्हावा अशी खानापूर विधानसभा मतदार संघातील नेते, कार्यकर्ते व जनतेची इच्छा आहे. आज पर्यंत खानापूर विधानसभा मतदार संघातील लोकप्रतिनिधी राज्यमंत्रिमंडळात संधी मिळाली नाही. आमदार अनिल बाबर यांना मंत्रिपद देऊन मतदार संघाचा राजकीय अन्याय दूर करावा व राजकीय अनुशेष भरून काढावा अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे.