माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडीमध्ये राहणाऱ्या चि.षण्मुख अमोल हिंडे या पाच वर्षीय चिमुकल्याने महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसुबाई हे शिखर सर केले आहे. षण्मुख हा डायनामिक इंग्लिश मिडियम स्कूल आटपाडी येथील बालवाडीच्या वर्गात शिकत असून त्याचे वडील व तो कळसूबाई शिखर पाहण्यासाठी गेले होते. शनिवारी सकाळी साडेनऊ कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी असतानाच षण्मुखने सांगितले तो स्वतःच पूर्ण शिखरावर चालत जाणार आहे. त्याचा निश्चय पाहून तेथील मार्गदर्शक देखील त्याचे कौतुक करायला लागले. तो दुपारी साडेबारा वाजता कळसुबाई शिखरावर पोहोचला होता. अर्ध्या तासाच्या विश्रांतीनंतर तो संपूर्ण शिखर उतरून साडेचार वाजता खाली आला. १६४६ मीटर उंच असलेल्या या कळसुबाई शिखरावर चढण्याचा विचारच अनेकांच्या मनात धडकी भरवतो. अनेकजण अर्ध्यातूनच परतत असतात. अशावेळी षण्मुखने हे शिखर सर केले ही अतिशय महत्त्वपूर्ण मानले जात आहे. एव्हरेस्ट शिखर सर करणारा सर्वात लहान व्यक्ती म्हणून षण्मुख आटपाडीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवेल असा विश्वास अनेक लोकांनी व्यक्त केला आहे.