माणदेश एक्सप्रेस न्यूज
आटपाडी :वंचित बहुजन आघाडीकडून खानापूर विधानसभेचे मैदान मारण्यासाठी श्रावणदादा वाक्षे यांची उमेदवारी असल्याचे भारिपचे तालुकाध्यक्ष साहेबराव चंदनशिवे यांनी बोलताना सांगितले.
यावेळी ते म्हणाले, खानापूर विधानसभा मतदार संघामध्ये सद्गुरू श्री श्री साखर कारखान्याचे संचालक श्रावणदादा वाक्षे यांना वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी दिली आहे. लोकसभेच्या झालेल्या निवडणुकीमध्ये मतदार संघामध्ये वंचित आघाडीला सर्वाधिक मतदान झाले होते. मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी वंचित आघाडी निवडणुकीच्या मैदानात आहे. मतदार संघातील लोकप्रतिनिधी आज पर्यंत पाण्याचेच राजकारण केले आहे व अजून ही ते करीत आहेत. तर माजी लोकप्रतिनिधी हे निवणूक आली की आटपाडी तालुक्यात फिरताना लोकांना दिसू लागले आहेत व पाच वर्षापूर्वी केलेला विकास लोकांना सांगू लागले आहेत. तर कधी काळी टेंभू योजना म्हणजे त्यांना दिवास्वप्न वाटत होते तेच आता आमच्याच काळात टेंभू योजनेचा सर्वाधिक निधी मिळाला होता असे सांगत सांगून लोकांची दिशाभूल करीत आहेत.
हे सर्व बदलण्यासाठी व खानापूर मतदार संघाच्या विकासासाठी वंचित बहुजन आघाडीचे सरकार सत्तेत आणण्यासाठी खानापूर मतदार संघातून श्रावणदादा वाक्षे यांची उमेदवारी पक्षाने जाहीर केली असल्याचे साहेबराव चंदनशिवे म्हणाले.