माणदेश एक्सप्रेस न्युज
खरसुंडी/मनोज कांबळे : तीन शिक्षण संस्था, ग्रामस्थ यांनी आटपाडी आगार प्रमुखांना निवेदन देऊनही विद्यार्थ्यांसाठी बससेवा सुरू करण्यात येत नसल्याने आटपाडी आगाराबाबत मोठी नाराजी निर्माण झाली आहे. खरसुंडी व परिसरातील किमान पन्नास विद्यार्थी माध्यमिक, उच्च माध्यमिक व पदव्युत्तर शिक्षणाकरिता सकाळी सात ते आठ या वेळेत येथून शिक्षणाची सोय असल्याने विटा येथे जात असतात.
आतापर्यंत हे विद्यार्थी आटपाडी-बोरवली बसने जात होते. मात्र गेली अनेक वर्षे सुरू असलेली ही बस मागील दोन महिन्यापासून बंद करण्यात आली आहे. यामुळे या विद्यार्थ्यांना खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. परिणामी खाजगी वाहन न मिळाल्यास त्यादिवशी शिक्षणापासून वंचित रहावे लागते. यामध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
आटपाडी आगार प्रमुखांनी याचा विचार करून खरसुंडी येथून सकाळी सात ते आठ या वेळेत विट्याला जाणारी बससेवा सुरू करावी. बस सेवा सुरू झाल्यास विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही.