माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : सांगली जिल्ह्यातील सर्व कामगार हे शिवसेनेच्या पाठीशी ठाम असल्याचे मत सांगली शहर शिवसेना प्रमुख हरिदास लेंगरे म्हणाले. सांगली येथील हॉटेल माणदेशी येथे जिल्ह्यातील कामगारांचा मेळावा संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित म्हणून खानापुर विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार अनिलभाऊ बाबर होते.
यावेळी बोलताना आमदार अनिलभाऊ बाबर म्हणाले, सांगली येथे दुष्काळी भागातून आलेला कष्टकरी वर्ग मोठ्या प्रमाणात असून त्यांचे एकत्र संघटन करून सर्व तळागाळातील लोकांसाठी हरिदास लेंगरे यांनी चांगले काम केले आहे. त्यांच्या या लढ्याला मी लोकप्रतिनिधी या नात्याने संघटनेच्या पाठीमागे ठामपणे उभा राहून कामगाराचे व दुष्काळी भागातील लोकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
तर हरिदास लेंगरे म्हणाले, कष्टकरी वर्ग व शिवसेना यांचे नाते वेगळे आहे. शिवसेना ही नेहमी कष्टकऱ्यांच्या पाठीमागे उभी राहिली आहे असून कष्टकरी नेहमी शिवसेनेला साथ देत आला आहे. यावेळी देखील खानापूर मतदारसंघांमध्ये सर्व कामगार आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या पाठीशी उभे असून त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देणार आहेत. अनिलभाऊ हे सामान्य लोकांसाठी लढत असून त्यांनी कामगारांचे प्रश्न विधानसभेत मांडावेत. कामगारांना स्वस्त दरामध्ये घरे, कामगारांचे स्वतंत्र हॉस्पिटल असे अनेक प्रश्न आहेत ते येणाऱ्या काळात शिवसेनेच्या माध्यमातून मार्गी लागावे.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख शंभूराजे काटकर यांनी आभार मानले. तर निवृत्ती सरगर, हनुमंत शिंदे, दत्तात्रय यमगर, संभाजी लेंगरे आदी मान्यवर उपस्थित होते.