माणदेश एक्सप्रेस न्युज
म्हसवड/अहमद मुल्ला : दुष्काळाचे चटके सोसत असलेल्या माण तालुक्यातील वरकुटे, वाकी व माळवाडी परिसरातील नागरिक उरमोडीचे पाणी माणगंगा नदीमध्ये पळशी, गोंदवले मार्गे सोडावे या मागणीसाठी आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. नुकतीच वरकुटे येथे या गावांमधील नागरिकांची बॆठक झाली असून सोमवारी या संदर्भातील निवेदन जिल्हाधिकारी सातारा यांची भेट घेऊन देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
उरमोडीचे धरण क्षेत्रातील काही गावांचे पुनर्वसन वाकी, पळशी गावांमधून करण्यात आले आहे. त्यासाठी नाममात्र किंमत देऊन तेथील नागरिकांच्या जमिनी संपादित केल्या आहेत. पण याच गावातील नागरिकांना उरमोडीच्या पाण्यापासून वंचित ठेवण्यात आले आहे.
उरमोडीचे पाणी म्हसवडला सोडण्यासाठी दिवड, ढाकणी या मार्गाचा वापर केला जात आहे. या मार्गे चार वेळा माणगंगा नदीला पाणी सोडण्यात आले. त्यामुळे त्या परिसरातील नागरिकांचीही सोय होत आहे याला आमची हरकत नाही पण त्यांचे बंधारे तलाव भरुन झाल्यावर ते पाणी लोधवडे, मनकर्णवाडी, गोंदवले, पळशी मार्गे माणगंगा नदिपात्रात सोडल्यास वरील गावांचा पाणीप्रश्न सुटेल तेथील पाण्याचे टँकर बंद होतील तर काही कालावधीत जनावरांच्या छावण्याही बंद होतील. यामुळे शासनाचा टँकर व छावण्यावर होणारा कोट्यावधी रूपयांचा खर्च वाचणार आहे.
या बाबीचा विचार करुन पाटबंधारे विभागाने तातडीने पावले उचलीत व वरील मार्गे माणगंगा नदीत पाणी सोडावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. पाणी सोडले नाही तर मात्र नागरिकांना आंदोलन करावे लागेल असेही सांगण्यात आले.
याबाबत पाटबंधारे विभागाच्या अभियंता पवार यांच्याशी फोन वरुन संपर्क साधला तेव्हा त्यांनी सांगीतले की, पळशी मार्गे पाणी सोडण्यात आले आहे. पण कमी दाबाने असल्यामुळे ते वरकुटे परिसरात पोहोचण्यासाठी दहा बारा दिवसांचा कालावधी लागणार आहे.
सध्या या कालव्या मधून वाहणारे सर्व पाणी जर वरील मार्गे माणगंगा नदित सोडण्यात आले आहे तर चार पाच दिवसातच पाणी वरकुटे परिसरात पोहचेल व पाठीमागील अनुभव लक्षात घेता पाण्याची मुदत संपण्याच्या आतच पूर्ण पाणी सोडावे.ताज्या घडामोडी व बातम्यासाठी आमच्या दैनिक माणदेश या व्हाटस अप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी लिंक ला क्लिक करा.
श्रीराम पाटील
मा.सभापती पं.स.माण