माणदेश एक्सप्रेस न्युज
माळशिरस/संजय हुलगे : दिव्यांग व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी शासन विविध स्थरावर प्रयत्न करीत आहे. बँका पतपुरवठा करीत असुन कर्ज परतफेडी सुस्थित आहे. त्यामुळे वेगवेगळया योजनांच्या माध्यमातुन दिव्यांगांनी सुद्धा स्वावलंबी बनले पाहीजे. असे मत अकलुज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहीते-पाटील यांनी व्यक्त केले. ते पंचायत समितीच्या वतीने माळशिरस येथे आयोजित केलेल्या अपंग मेळाव्यात बोलत होते. यावेळी मदनसिंह मोहीते-पाटील, उपसभापती किशोर सुळ, अर्जुनसिंह मोहीते-पाटील, प्रताप पाटील, बाळासाहेब होले, रावसाहेब पराडे, स्वप्निल वाघमारे, सचिन पाटील, डॉ आव्हाड, बाजीराव काटकर, अरविंद भोसले , गटविकास अधिकारी स्मिता पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
दिव्यांग बांधवाना शासनाचे दिव्यांग ऑनलाईन नोंदणी असलेले प्रमाणपत्र आवश्यक आहे. यात प्रथम स्वावलंबन नोंदणी, यु.डी.आय.डी. नोंदणी व त्यानंतर आरोग्य तपासणी अशी प्रक्रिया असते यासाठी जिल्हा स्तरावर ५ ते ६ हेलपाटे मारावे लागतात. त्यासाठी अपंग संघटना व पंचायत समितीच्या वतीने यातील दोन नोंदणी केल्या जाणार असुन दिव्यांग बांधवांचा त्रास कमी करण्याच्या दृष्टीने पंचायत समितीच्या माध्यामातुन दिव्यांगासाठी तीन दिवसीय शिबीराचे आयोजन करण्यात आले. यावेळी गोरख जानकर, शहाजी देशमुख, विजय कुलकर्णी, दादासाहेब हुलगे आदी मान्यवरांनी देत दिव्यांगाच्या व्यथा मांडल्या.
यावेळी पुढे बोलताना मोहीते-पाटील म्हणाले की, तज्ञ डॉक्टरांमुळे जिल्हाच्या ठिकाणी जावे लागते. या त्रासामुळे अपंग प्रमाणपत्रापासुन वंचित राहतात त्यामुळे त्यांना मदत होणे गरजेचे आहे. ग्रामपंचायत व अपंगानी समन्वय ठेवावा. यावेळी हजारो दिव्यांग बांधव व त्यांचे पालक सहकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार किशोर सुळ यांनी मानले.