माणदेश एक्सप्रेस न्यूज
आटपाडी/धिरज प्रक्षाळे : वंचित बहुजन आघाडीचे महासचिव गोपीचंद पडळकर हे भाजपच्या प्रवेशाच्या वाटेवर असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत असल्याने वंचितचे संस्थापक सदस्य माजी आमदार लक्ष्मण माने यांनी पुन्हा वंचितमध्ये घरवापसी होणार काय? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
तत्कालीन भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी लोकसभेला बंड करीत भाजपमधून बाहेर पडत त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करीत सांगली लोकसभेची निवडणूक लढविली. वंचितमध्ये येताना गोपीचंद पडळकर यांच्यावर अनेक आरोप झाले होते. या सर्वांच्या आरोपाकडे दुर्लक्ष करीत बाळासाहेब आंबेडकर यांनी त्यांना वंचित बहुजन आघाडीत घेतले व सांगली लोकसभेसाठी त्यांना तिकीट दिले होते. त्यामध्ये त्यांचा पराभव झाला होता. परंतु त्यांनी वंचित आघाडीच्या सर्व उमेदवारात जास्त मतदान घेतले होते. त्यामुळे त्यांच्यावर बाळासाहेब आंबेडकर यांनी विश्वास दाखवत त्यांना वंचित बहुजन आघाडीचे महासचिवपदी दिले होते. त्यामुळे वंचितचे संस्थापक सदस्य असलेले माजी आमदार लक्ष्मण माने यांनी गोपीचंद पडळकर व बाळसाहेब आंबेडकर यांच्यावर आरोप करीत वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडले होते.
परंतु आता राजकीय घडामोडी वेगाने घडत असून गोपीचंद पडळकर हे वंचित पासून दुरावले असल्याने ते पुन्हा भाजपच्या झेंडा हातात घेणार असल्याने त्यांच्या जवळ्च्या व विश्वासू कार्यकर्त्यांनी सांगितले असून सध्या गोपीचंद पडळकर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. त्यामुळे ज्या गोपीचंद पडळकर यांच्यामुळे लक्ष्मण माने हे बाहेर गेले होते ते पुन्हा वंचित बहुजन आघाडीत येणार? असे जरी सांगितले जात असले तरी त्यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी मात्र महाराष्ट्र वंचित बहुजन आघाडी हा पक्ष रजिस्टर केला असून आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत सामील झालो असल्याचे त्यांनी सांगिलते असले तरी हे राजकारण असल्याने येथे काहीही होवू शकते हे मात्र नक्की.