पश्चिम भारतात विटा शहराचा प्रथम क्रमांक
सर्वसाधारण नगरपालिका गटात विटा शहर भारतात चौथ्या क्रमांकावर ; सर्वाधिक स्वच्छ शहर म्हणून विटा पालिकेचा दिल्ली येथे गौरव
माणदेश एक्सप्रेस न्यूज
विटा/प्रतिनिधी : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मध्ये विटा नगरपरिषदेने उल्लेखनीय यश संपादन करत, पश्चिम भारतात ५ राज्यांमध्ये २५ हजार ते ५० हजार लोकसंख्या असणाऱ्या नगरपालिका गटात पहिला क्रमांक मिळवला. तसेच स्वच्छ शहराच्या क्रमवारीमध्ये सर्वसाधारण नगरपालिका गटात भारतामध्ये विटा शहराने चौथा क्रमांक पटकावला.
दिल्ली येथे केंद्रीय नगरविकास मंत्री हरदीप एस पुरी यांच्या हस्ते व सेक्रेटरी नगरविकास केंद्र सरकार दुर्गा शंकर मिश्रा यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार विटा नगरपरिषदचे मा. नगराध्यक्ष वैभव पाटील, नगराध्यक्षा सौ.प्रतिभा पाटील, उपनगराध्यक्ष दहावीर शितोळे, मुख्याधिकारी महेश रोकडे, आरोग्य सभापती अँड. विजय जाधव यांना वितरण करण्यात आला. विटा शहराने स्वच्छ सर्वेक्षणमध्ये चमकदार व दमदार कामगिरी करत देशपातळीवर स्वच्छ शहर म्हणून झेंडा फडकवला आहे. यामुळे विटेकरांची छाती अभिमानाने फुलली आहे.
घनकचरा व्यवस्थापन, कचरा विलगीकरण, हगणदारीमुक्त शहर, प्लास्टिकमुक्त, कचराकुंडीमुक्त, वराहमुक्त, झोपडपट्टी मुक्त शहर तसेच शहरातील सार्वजनिक ठिकाणी सुशोभिकरण, घनकचरा प्रक्रिया प्रकल्प, सेंद्रिय खत, बायोचार यासोबतच शहरामध्ये नित्य साफसफाई, जनजागृतीसाठी अनेक उपक्रम पालिकेने हाती घेत केलेल्या परिश्रमाचे आणि यामध्ये विटेकर नागरिकांनी घेतलेला हा उत्फूर्त सहभाग यामुळेच हे यश मिळवण्यात पालिकेला यश आले आहे. हा सन्मान सर्व विटेकर नागरिकांचा आहे, असे प्रतिपादन अँड.वैभव पाटील यांनी केले.
पश्चिम भारतात 5 राज्यामध्ये 25000 ते 50000 लोकसंख्या असणाऱ्या नगरपालिका गटात विटा नगरपालिका प्रथम आली आहे. सर्वसाधारण नगरपालिका गटात भारतात, विटा शहराचा 4 था क्रमांक आला आहे. सर्वांचे मनापासून अभिनंदन. केंद्रीय नगरविकास मंत्री हरदीप एस पुरी यांचे हस्ते व दुर्गा शंकर मिश्रा सेक्रेटरी नगरविकास केंद्र सरकार यांचे उपस्थित पार पडला.
मुख्याधिकारी महेश रोकडे