म्हसवड पालिकेच्या सर्वसाधारण सभेत खडाजंगी
माणदेश एक्सप्रेस न्यूज
म्हसवड/अहमद मुल्ला: बुधवारी दि.२८ रोजी झालेल्या म्हसवड पालिकेच्या घेण्यात आलेल्या विशेष सभेत सन २०१९-२० या वित्तीय वर्षाचा अर्थसंकल्प मांडण्यात आला. यावेळी या अर्थसंकल्पावर विरोधक व सत्ताधारी पार्टीतील नगरसेवक व नगराध्यक्ष यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. म्हसवड पालिकेच्या सभागृहात विशेष सर्वसाधारण सभा व त्यानंतर वित्तीय वर्षाचा अर्थसंकल्पाची विशेष अशा दोन सभा घेण्यात आल्या. या दोन्ही सभेत सत्ताधारी व विरोधक यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याने, पालिकेने केलेल्या विकासाच्या संकल्पाला कसलाही अर्थ राहिला नसल्याचे दिसुन आले. या दोन्ही सभा नगराध्यक्ष तुषार विरकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आल्या. यावेळी मुख्याधिकारी पंडित पाटील उपस्थित होते.
बुधवारी म्हसवडचा आठवडा बाजार होता. यावेळी पालिकेच्या सभागृहात मैरेथॉन दोन सभा घेण्यात आल्या. या दोन्ही सभेतील विषयावरून सत्ताधारी व विरोधक यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. ही खडाजंगी पाहिली असता नक्की बाजार पालिकेच्या पटांगणावर भरला आहे? का पालिकेच्या सभागृहात भरला आहे? हेच समजत नव्हते. या विशेष सर्वसाधारण सभेत एकुण चार विषय होते. हे चारीही विषय सोडुन विरोधी नगरसेवक अकिल काझी यांनी दि. २२ आक्टोंबर २०१८ च्या सभेत वाळूगट आरक्षित करणेचा विषय हा सभागृहात बहुमताने नामंजुर झाला असताना, ५ नोव्हेंबर २०१८ च्या सभेत तो मंजुर करणेत आला होता. त्यावर काझी यांनी जोरदार अक्षेप घेतला आणि याच विषयावर किमान तास ते दिड तास गोंधळ सुरू होता.
यानंतर सन २०१९-२० या वित्तीय वर्षाचा अर्थसंकल्पाची विशेष सभा घेण्यात आली. यावेळी सभेपुढे वित्तीय वर्षाचा अर्थसंकल्प ठेवण्यात आला. यात दुष्काळी परिस्थिती असल्याने पालिकेने या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ केली नसल्याने, म्हसवडकर जनतेला काहिअंशी दिलासा मिळाला असला तरी मागील वित्तीय वर्षातील खर्चाचा तपशील मांडल्यावर सत्ताधारी पार्टीतील काही प्रमुखमंडळीनी जनतेच्या पैशाची लुट करून आपली घरे भरण्याचा उद्योग केला असल्याचा आरोप विरोधकांनी यावेळी केला. यात मागील वर्षाच्या तपशिलात इतर बांधकामात झालेला खर्च २८ लाखाच्या मुद्द्यावरून काझी यांनी अक्षेप घेत हा खर्च नक्की कोठे केला यावर विचारले असता, नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही.
यावर काझी यांनी या कामात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप सभागृहात केला तर पाणीपुरवठा मजुर ठेक्याचे बिल अदा केल्याचे दिसुन आल्याने विरोधकांना गोंधळ घालत आठ ते दहा दिवसातुन एकदा पाणी सोडले जाते तर मग एवढे मजुर नेमके कोणते काम करतात? मग एवढे बिल कसे काढण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित करून गेल्या वर्षभरात पाण्याच्या टैंकरचे बिल ७ लाख ७१ हजार व ४ लाख ४१ हजार ऐवढे बिल काढले असुन पालिकेच्या इतिहासात आजपर्यंत एवढे बिल कधीच निघाले नसल्याचे विरोधी नगरसेवक डॉ.वसंत मासाळ म्हणाले.
तसेच नेते आमदार जयकुमार गोरे यांनी मागील सत्तेच्या काळात आणलेले शहराच्या विकासासाठी वैशिष्ठ्यपुर्ण योजनेतील बहुउद्देशीय हॉलचा तब्बल तीन कोटीं एकोणसाठ लाख रूपयाचा निधी खर्च न झाल्याने परत गेला असल्याचा आरोप विरोधकांनी केला. तर मागील सभेत गार्डनला राजमाता अहिल्यादेवी होळकर हे नाव देण्याचा ठराव झाला असुन, या गार्डनला राजमाता अहिल्यादेवी होळकरांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी नगरसेवक डॉ. वसंत मासाळ यांनी केली.
यावेळी सत्ताधारी पार्टीच्या नगरसेविका श्रीमंत हिंदमालादेवी राजेमाने, सविता म्हेत्रे, कलावती पुकळे, नगरसेवक धनाजी माने, दिपक बनगर, गणेश रसाळ, शहाजी लोखंडे, संग्राम शेटे, केशव कारंडे तर विरोधी पार्टीचे नगरसेविका मनिषा विरकर, शोभा लोखंडे, नगरसेवक अकिल काझी, डॉ.वसंत मासाळ, विकास गोंजारी, रणजित येवगे आदी नगरसेवक हजर होते.