सलग सहा वेळा पराभव झालेल्यांनी आपली लायकी तपासावी : शेखर रणदिवे
माणदेश एक्सप्रेस न्युज
दिघंची/वार्ताहर: स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ते संजय वाघमारे यांचा दुसऱ्या पिढीपर्यंत आज अखेर सलग सहा वेळा दिघंची ग्रामपंचायत निवडणुकीत सपाटून पराभव झाला आहे. जे आयुष्यभर लोकांचे तळवे चाटत स्वत:चा प्रपंच करीत होते व आजही करत आहेत, अशांनी ॲड. विलास देशमुख यांच्यावर टीका करताना आपली लायकी तपासावी व कठीण प्रसंगी देशमुख यांनी अनेक वेळेला केलेली मदतीची जाणीव ठेवावी अशी टीका युवा नेते शेखर रणदिवे यांनी संजय वाघमारे यांच्यावर केली.
ॲड. देशमुख यांनी दिघंची बस स्थानकाच्या पाठीमागील कोट्यावधी रुपयांची जागा बौद्ध विहारासाठी स्वर्गीय पतंगराव कदम व मोहनकाका भोसले यांच्या मार्फत सन 2009 साली पंचक्रोशीतील अनेक घटकांचा विरोध पत्करून मंजूर करून दाखवली हे संपूर्ण तालुक्याला माहित आहे. अशा सामाजिक कार्यासाठी योगदान देणाऱ्या ॲड. देशमुख सारख्या व्यक्तीवर संजय वाघमारे यांना गरज नसताना टीका करताना आपण कोणावर टीका करतो याची जाण ठेवायला पाहिजे होती.
ॲड. देशमुख हे काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. तुमच्या नेत्यांनी आमदारकीची निवडणूक सहापैकी चार वेळा वेगवेगळ्या पक्षाच्या चिन्हावर लढवली. त्यांना पक्षनिष्ठेचा जाब विचारावा. कुठलीही विचारधारा नसणाऱ्या नेत्यांच्या पिलावळीने ॲड. देशमुख यांना पक्षनिष्ठेची तत्वे देऊ नये. तालुक्यातील तुमच्या स्वयंघोषित नेत्याला कोणाची तरी कुबडी घेतल्याशिवाय यश आलेले नाही. स्वतंत्र निवडणुका लढल्यानंतर काय अवस्था होते हे गत पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत तालुक्यातील जनतेने दाखवून दिले आहे. राजकारणातून तुमच्या नेत्यांची मोठ्या भानगडीत काय अवस्था झाली आहे हे संपूर्ण तालुक्यातील जनतेने पहिले आहे. आम्ही सर्व कार्यकर्ते ॲड. देशमुख यांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून तुमच्या नेत्याला इथून पुढच्या सर्व निवडणुकीशिवाय घरी बसविल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला ज्या भाषेत समजेल त्या भाषेत उत्तर दिले जाईल. शिवसेना स्टाईल म्हणाल तर, शिवसेनेच्या वाघाचे दात घशात घालण्याची धमक आमच्यात आहे.
ग्रामपंचायतीच्या गटार, रस्ते या कामाचे बिल निघत नाही, सावकारांचा पैशाचा तगादा मागे आहे. म्हणून तुम्हाला ॲड. देशमुख यांच्यावर टीका करावी लागते हे दुर्दैव. तुमची राजकारणातील लुडबुड जनता ओळखून आहे. आमदारांनी किंवा तालुक्यातील नेत्यांनी मतदारसंघाचा किती विकास केला याचा योग्यवेळी ॲड. देशमुख खुलासा करतीलच. नेत्यांनीसुद्धा लाभार्थी जपून सांभाळावेत. वडाप वगैरे पिलावळ यांच्यावर लगाम घालावा. अन्यथा गव्हाबरोबर किडे हि रगडले जातील याचे भान ठेवावे. ॲड. देशमुख पॅकेज घेणारे नसून पॅकेज देणाऱ्यापैकी आहेत व त्यांच्या पॅकेजचे लाभार्थी दस्तरखुद्द संजय वाघमारे आहेत हे त्यांना माहीत आहे.
ॲड. वैभव पाटील यांनी बळीराजा शेतकरी संघटनेच्या आंदोलनात भेट देऊन पाठिंबा दिला त्याचा एवढा पोटशूळ तालुका शिवसेनाप्रमुखांना उठला असेल तर माजी आमदार ॲड. सदाशिव पाटील यांचा झंझावात सुरू झाल्यावर तुमची आणि तुमच्या नेत्याची काय अवस्था होईल याची कल्पना न केलेली बरी. ॲड. देशमुख हे स्वाभिमानाने समाजकार्य व राजकारण करतात हे संपूर्ण तालुक्याला माहित आहे. त्यामुळे टीका करताना आपली लायकी तपासून टीका करावी अन्यथा गाठ आमच्याशी आहे. असेही शेखर रणदिवे यांनी म्हटले आहे.