शाळेपासून वंचित विद्यार्थ्यांची जबाबदारी दिघंची करांनी घेतली
सरपंच अमोल मोरे,शिक्षक शांताराम यादव यांचा पुढाकार
माणदेश एक्सप्रेस न्युज
दिघंची/प्रतिनिधी: दिघंची येथील स्वछता काम करणारा मजूर रमेश पवार यांची अपत्ये शिक्षणापासून वंचित होती. त्याची दखल घेत सरपंच अमोल मोरे, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक शांताराम यादव यांनी पुढाकार घेऊन तीन विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेत दाखल करून घेत त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. गुरुवारी या चिमुकल्यांना शाळेत दाखल करून समाजापुढे एक नवा आदर्श दिघंचीकरणी घालून दिला आहे.
दिघंची येथे स्वछता कामगार रमेश पवार हे मूळचे भंडी शेगाव (ता-पंढरपूर, जि. सोलापूर ) येथील परंतु कामानिमित्त भटकंती करत असताना ठिकठिकाणी गाव बदलल्यामुळे मुलांची शिक्षणाची हेळसांड झाली. परिणामी मुलांना शाळेत दाखलच केले नाही. आई वडील कामाला जात असल्याने व एका ठिकाणी मुक्काम नसल्याने मुले शाळेपासून वंचित राहिली.
लहान मुलांची शिक्षणा पासून होणारी परवड दिघांचीचे सरपंच अमोल मोरे व जिल्हा परिषद शाळा नं 3 चे मुख्याध्यापक शांताराम यादव यांच्या लक्षात येताच त्यांनी पुढाकार घेऊन त्यांनी शाळेत दाखल करून घेतले. यावेळी दिघंची येथील हिरा सामाजिक संस्थेचे मुन्नाभाई तांबोळी यांनी या तीन विद्यार्थ्यांना शालेय साहित्य भेट दिले. .सावंता पुसावळे यांनी या उपक्रमाचे कौतुक करत शांताराम यादव यांच्यासह शाळेच्या स्टाफ चे कौतुक करत समस्त दिघंचीकर शाळेपासून वंचित असणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करतील असा आशावाद व्यक्त केला.
कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य प्रकाश शिंदे, संजय वाघमारे, दादासाहेब देठे, नवनाथ रणदिवे, सखाराम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. शाळेपासून वंचित असणाऱ्या चिमुकल्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणल्यामुळे त्यांचा शैक्षणिक विकास होईल त्यामुळे या उपक्रमाचे दिघांची परिसरात कौतुक होत आहे.