आटपाडी बिडीओविरुद्ध पदाधिकाऱ्यांचे बंड
मनमानी कारभार, दांड्या ; दुष्काळग्रस्तांची चेष्टा भोवली
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी मीना साळुंखे यांच्याविरुद्ध आटपाडी तालुक्यातील सांगली जिल्हा परिषदेचे व आटपाडी पंचायत समितीचे पदाधिकारी यांनी बंड पुकारून त्यांची तातडीने बदली करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशा स्वरूपाची मागणी सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अभिजित राऊत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
आटपाडी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी मीना साळुंखे यांचा पंचायत समितीमध्ये मनमानी कारभार चालू आहे. कामावर त्या कधीच हजर राहत नाहीत. नेहमी दांड्या मारत असतात. जर एखाद्या वेळेस आल्या तर हजेरी मस्टरवर सही करून भागात जाते म्हणून निघून जातात. त्या परत ऑफिसकडे येत नाहीत. तसेच सध्या तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने मजुरांना रोजगार नाही. गटविकास अधिकारी या रोजगार हमीची कामे मंजूर न करता त्या कामाकडे लक्ष न देता त्यांनी तालुक्यातील दुष्काळी लोकांची कुचेष्टा करण्याची चालू केली आहे. तसेच ऑफिसमध्ये जर एखाद्या वेळेस त्या असल्या तर दोन-तीन तास पदाधिकाऱ्यांना एखाद्या कामावर विषयावर चर्चा करण्यासाठी वेळ देत नाहीत. मी कुठलेही कामे करणार नाही अशा पद्धतीने उत्तर देतात. त्यांच्या या मग्रुरी स्वभावामुळे आटपाडी तालुक्यातील लोकांचे ऐन दुष्काळात हाल होत आहेत. मजुरांना कोणत्या प्रकारचा रोजगार उपलब्ध नाही.
त्यांच्याविरुद्ध सांगली जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर, आटपाडी पंचायत समितीच्या उपसभापती पुष्पाताई जयवंतराव सरगर, सांगली जिल्हा परिषदेचे सदस्य अरुण बालटे, वंदना हरिदास गायकवाड, आटपाडी पंचायत समितीचे सदस्य दादासाहेब मरगळे यांनी त्यांच्या या प्रकाराविरुद्ध बंड पुकारले असून, त्यांची तातडीने बदली करण्यात यावी व त्यांच्यावर चौकशी करून ताबडतोब कारवाई करण्यात यावी अशी मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.
आटपाडी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी मीना साळुंखे या कामावर रुजू झाल्यापासूनच वादग्रस्त ठरल्या होत्या. त्यांनी पंचायत समितीमध्ये विकासकामांच्या बाबतीत लोकांची अडवणूक करून त्यांना आर्थिक पास टाकत होते. दुष्काळी कामांमध्ये विहिरीच्या फायली मंजुरी करताना त्या रकमेशिवाय काम करत नव्हत्या. अशा अनेक जणांनी तक्रारी करूनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे त्यांच्याविरोधात तक्रारींचा ओघ वाढला. त्यांचा आटपाडी पंचायत समितीमधील कार्यकाल संपूनही त्यांनी याच ठिकाणी ठाण मांडले आहे. बदली झाल्याची चर्चा गेल्या वर्षभरापासून गाजत आहे. मात्र अजूनही त्या आटपाडीतील खुर्चीला बिलगून आहेत.