कुरूंदवाडीच्या हद्दीत सुरू झालेल्या कामाची पाहणी करताना निवृत्त डि.वाय एस.पी.दत्तात्रय सोनवणे, मनोहर जगताप, तानाजीशेठ बनगर, भारत अनुसे, सुभाष जगताप, बापुसाहेब बनगर. |
वरकुटे-मलवडी परिसरातील बंद पडलेले टेंभू योजनेचे काम धुमधडाक्यात सुरु
पाच गावच्या १५ हजार नागरिकांनी व्यक्त केले समाधान..
वरकुटे-मलवडी/वार्ताहर: कायम दुष्काळी परिस्थिती असलेल्या माण तालुक्यातील पुर्वेकडील वरकुटे-मलवडी, महाबळेश्वरवाडी, बनगरवाडी, कुरणेवाडी या गावांना खासबाब म्हणून पिण्याचे पाणी देण्यासाठी ४.३३ कोटी एवढा निधी खर्च करून अश्वगतीने काम सुरू केले होते. परंतु गेली दिड महिना झरे ता. आटपाडी जवळच्या कुरंदवाडी नागरिकांनी अडवलेले पाईपलाईन चे काम चार पोकलन आणि तिन जेसीबीच्या सहाय्याने पुर्ववत सुरु झाल्यामुळे पाच गावातील नागरिकांच्यात चैतन्य निर्माण झाले आहे.
खासबाब म्हणून टेंभू उपसा योजनेतून कायमस्वरूपी दुष्काळी परिस्थिती आणि कमालीची पाणी टंचाई असलेल्या पुर्वेकडील भागाचा यामुळे पिढ्यानपिढ्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकालात निघणार आहे. दुष्काळी परिस्थिती असताना ऐन ऊन्हाळ्याच्या सुरूवातीलाच म्हणजे मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाबळेश्वरवाडी च्या तलावात पाणी सुटण्याचे खात्रीलायक वृत्त आहे. स्वातंत्र्यकाळापासून पंधरा हजार नागरिकांची पाण्यासाठी होत असलेली परवड संपुष्टात येणार आहे आणि नागरिकांना उन्हाळ्यात पाण्यासाठी करावी लागणारी वणवण थांबणार आहे. तर दररोज टँकरवर करावा लागणारा शासनाचा लाखों रूपयांचा खर्च ही वाचणार असून या भागातील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार असल्याने सामान्य नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.
दोन महिने बंद पडलेले काम सुरू झाल्यामुळे मार्च महिन्याच्या सुरूवातीला पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे ऐन दुष्काळात दिलासा मिळणार आहे. टेंभू उपसा सिंचन योजनेतून पाच गावासाठी खास बाब म्हणून शासनाने पिण्याच्या पाण्यासाठी हि योजनेचे काम सुरू करुन ऐतिहासीक काम केलं आहे. यामुळे प्रत्येक वर्षी पिढ्यानपिढ्यांना करावी लागणारी वणवण थांबणार आहे. त्यामुळे पंधरा हजार नागरिक समाधान व्यक्त करित आहेत.भारत भानदास अनुसे (चेअरमन)पाणी संघर्ष चळवळीचे कार्यकर्ते..