आटपाडीत १० रोजी शिवसेनेचा शेतकरी मेळावा-हरिदास लेंगरे
प्रा. नाम. नितीन बानगुडे-पाटील यांचा नागरी सत्कार
माणदेशएक्सप्रेस न्युज
आटपाडी/वार्ताहर: आटपाडी येथे दिनांक १० नोव्हेंबर रोजी शिवसेनेचा भव्य शेतकरी मेळावा व कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रा.नितिन बानुगडे-पाटील (राज्यमंत्री दर्जा) यांचा नागरी सत्कार समारंभ कार्यक्रम संपन्न होणार असल्याची माहिती महाराष्ट्र जनविकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन चे संस्थापक सचिव तथा शिवसेनेचे युवा नेते हरिदास लेंगरे यांनी कार्यक्रमाच्या पूर्वतयारी व नियोजनानिमित्त येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली. यावेळी शिवसेनेचे सांगली जिल्हाध्यक्ष संजय विभूते यांच्यासह शिवसेनेचे तालुका अध्यक्ष साहेबराव पाटील, उपजिल्हाप्रमुख मोहनभाऊ देशमुख, शिवसेनेचे नेते गौरीशंकर नळ-भोसले, कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष सुभाष जगताप, युवा नेते पै.संतोष पुजारी, आंबेवाडीचे उपसरपंच वसंत अर्जुन, कौठुळीचे माजी सरपंच कदम उपस्थित होते.
यावेळी बोलताना संजय विभूते म्हणाले, आटपाडी तालुक्यात दुष्काळाच्या सवलती सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आल्या आहेत, परंतु यापुढील काळात दुष्काळ कधीच पाहायला मिळणार नाही, यासाठी शिवसेना व आमदार अनिल बाबर यांच्या माध्यमातून प्रयत्न होणार आहेत. दुष्काळाचा कलंक पुसण्याचे काम केले जाणार आहे. टेंभू योजनेपासून वंचित असणाऱ्या गावांचा टेंभू योजनेमध्ये समावेश करावा, त्याची पूर्तता करावी, यासाठी या मेळाव्यात परिवहन मंत्री दिवाकर रावते, नितिन बानुगडे-पाटील, आमदार अनिल बाबर यांना निवेदन दिले जाणार आहे. याबाबतचा संदेश सर्व शेतकऱ्यांना व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी तालुक्यातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गावोगावी जाऊन हा मेळावा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावा.
शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांनी 25 नोव्हेंबर रोजी “चलो अयोध्या” हाक दिली आहे. आटपाडी तालुक्यातून यासाठी शेकडो कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, तालुक्यातील लोकांच्या नावांची नोंदणी 13 तारखेपर्यंत करावी, त्यामुळे पुढील वाहतुकीची व्यवस्था करणे सोयीचे होईल, यासाठी उपजिल्हाप्रमुख मोहनभाऊ देशमुख, आटपाडी तालुका प्रमुख साहेबराव पाटील, कामगार सेनेचे सुभाष देशमुख पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय विभूते यांनी केले.
जनविकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून हजारो कामगारांना अडी-अडचणीत मदत केली आहे. अनेक कामगारांना घरे देण्याचे काम केले आहे. घराविना कोणीही राहणार नाही, शिवसेनेच्या माध्यमातून काम करणार आहे, मुंबईमधील संपूर्ण माथाडी कामगार उभा राहिलेला आहे. तो सर्व वर्ग कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहे.
हरिदास लेंगरे,
संस्थापक सचिव
महाराष्ट्र जनविकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि
जनरल कामगार युनियन
महाराष्ट्रातील कामगारांची संख्या खूप मोठी असून त्यांच्यासाठी कामगार कल्याण योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा 470 कोटी रुपये निधी पडून आहे. शासन कामगार कल्याण कर कपात करून घेते, पण त्याचा निधी खर्च होतो का ते पाहिले जात नाही. यासाठी गवंडी काम करणारे, शेतमजूर, इतर सर्व मजूर वर्ग इत्यादी कामगारांनी संपर्क साधावा, असे आवाहन लेंगरे यांनी केले.