श्रीपूरमध्ये डेंग्यूचा पहिला बळी
माणदेश एक्सप्रेस न्युज
माळशिरस/प्रतिनिधी : श्रीपुर गावातील नागरिक डेंग्युसदृश्य आजाराने ग्रस्त असून त्यांच्यापैकी एका बालकाचा मृत्यू झाल्याने गावकऱ्यांत भीतीचे वातावरण आहे. श्रीपुर मधील ऋतिक अर्जुन काटे या 14 वर्षीय मुलाचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला आहे. डेंग्यू, चिकणगुनिया रुग्णांच्या संख्येत दररोज भर पडत असल्याने आरोग्य व ग्रामपंचायत प्रशासनाने तत्काळ आरोग्य सेवा पुरवाव्यात, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील श्रीपुर गावात डेंग्यु सदृश्य आजाराने चांगलेच थैमान घातले असून अस्वच्छतेनेही कळस गाठला आहे. हा आजार डेंग्यु असल्याचे नागरिकांचे म्हणणे असून यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. आरोग्य प्रशासन विभागाने मात्र हा 'व्हायरल फिवर' असल्याचे सांगण्यात येत आहे. यातच 14 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. रुग्णाची वाढती संख्या पाहून सर्वांनाच धडकी भरली आहे. अवघे गाव आजाराच्या विळाख्यात येत असल्याने प्रशासनाने तातडीने उपाय योजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.
श्रीपुर, महाळूंग गावात शिरताच गावात सर्वत्र अस्वच्छता पसरली असल्याचे दिसून येते. ठिकठिकाणी उकिरडे, साचलेले सांडपाणी आणि नाल्या तुंबलेल्या असल्याचे दिसून येते. गावातील रस्त्यावर घरांतील सांडपाणी वाहत असल्याचे दिसून येते. गटारी मधील पाणी वाहून जात नसल्याने ठिकठिकाणी पाणी साचून डेंग्यु, चिकणगूनियाचे व मलेरियाचे मच्छर मोठ्या संख्येने तयार झाले असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. पावसाळ्यापूर्वी व नंतर ग्रामपंचायतीतर्फे वेळोवेळी गटारीची साफसफाई, फॉगिंग केले नाही.
त्यामुळेच गावात डेंग्यु, चिकण गूनिया व मलेरियासदृश्य आजाराने थैमान घातले असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. महाळूंग ग्रामपंचायत चे स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.