माजी विद्यार्थी संघटनेचे काम कौतुकास्पद :आ.जयकुमार गोरे
माणदेश एक्सप्रेस न्यूज:
वरकुटे-मलवडी
वरकुटे-मलवडी येथील यशवंतराव चव्हाण माजी विद्यार्थी संघटनेने आदर्शवत कामाचा आलेख वाढता ठेवीत सामाजिक बांधिलकी जपली आहे.ही संघटना सर्वसामान्य,गरजूं विद्यार्थ्यांचा आधारवड बनली आहे.या पंचक्रोशीतील गरीब, होतकरू विद्यार्थ्यांची जीवनसंजीवनी म्हणून माजी विद्यार्थी संघटनेने मागील चार वर्षात समाज उपयोगी केलेले काम हे कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन आ.जयकुमार गोरे यांनी वरकुटे-मलवडी ता.माण येथे आयोजित स्नेहमेळाव्यात केले.
यशवंतराव चव्हाण माजी विद्यार्थ्यांनी गरजू विद्यार्थ्यांना हातभार लावून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी दिपावलीनिमित्त सर्वपक्षीय नेत्यांना एकत्रित घेवून आयोजित केलेला स्नेहमेळावा व किर्तीवंतांचा भव्य सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र राज्याचे आयकर आयुक्त डॉ. नितीन वाघमोडे,मोहोळचे तहसीलदार जीवन बनसोडे,उद्योजक अनिल पिसे,मुंबई एम.एम.आर.डीचे चिफ इंजिनिअर मधुकरराव खरात, जिल्हा परिषद सदस्या सौ.सुवर्णाताई देसाई, पंचायत समिती सदस्या सौ.चंद्राबाई आटपाडकर, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई, माजी सभापती वसंतराव जगताप,माणदेश फौंडेशनचे अध्यक्ष विजय पिसे,अध्यक्ष कांतीलाल आटपाडकर,सरपंच बाळकृष्ण जगताप, अंकुश गाढवे,सौ.रंजना बनगर, सौ.मंगलताई वाघमोडे, तसेच कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणून 'लागीरं झालं जी' फेम सरपंच व्लाँगचे चे वरिंदर सिंग,सुमित पुसावळे, ए.टी.जाधव, आदी मान्यवर उपस्थित होते.
आ.जयकुमार गोरे पुढे म्हणाले की,शापित दुष्काळाची वक्रदृष्टी ह्यावर्षी माण तालुक्यावर गडद होत चालली आहे. संकटाशी लढताना माणदेशी माणूस आजपर्यंत कधीच खचला नाही.याउलट संकटावर स्वार होवून सातत्याने लढा देत दुष्काळी मातीतील तरुण अधिकारी बनत आहेत.अशा तरूणांचा सन्मान करण्याचे भाग्य मला लाभले आहे.
यावेळी माजी कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या हस्ते दिप प्रज्वलीत करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. ते म्हणाले की,येथील तरुणांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून स्वतःला घडवण्यासाठी अखंडीतपणे आपली धडपड सुरु ठेवली पाहिजे.जशा मधमाशा वेगवेगळ्या फुलांतील परागकण वेचून मधाचे पोळं निर्माण करतात, तसे येथील तरूणांनी वेगवेगळ्या क्षेत्रातील ज्ञान ग्रहण करून या देशाचे अधिकारी घडावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमात यशस्वी व गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि गुलाबपुष्प देवून गौरवण्यात आले.
यावेळी डॉ.नितीन वाघमोडे, जीवन बनसोडे,अनिल देसाई,अनिल पिसे,यांनी मार्गदर्शनपर आपले विचार मांडले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात अध्यक्ष कांतीलाल आटपाडकर यांनी संघटनेचे जनहितवादी कार्य व संघटनेची उद्दीष्टे सांगितली.सुत्रसंचालन सिद्धार्थ सरतापे(सर) यांनी केले. आभार मुंबई पोलीस अनिकेत आटपाडकर यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संघटनेचे छगन पिसे, सचिव अर्जुन यादव, सुनील थोरात,माजी सरपंच विजयकुमार जगताप, अँड सतिश जगताप, शहाजी बनगर,चंद्रकांत जाधव युवराज जगताप.यांनी विशेष प्रयत्न केले.