पांडुरंग कारखान्याचा सुपंथ साखर पॅकिंगचा विक्री शुभारंभ
पहिल्याच दिवशी पाच टन पॅकिंग साखर व्यापाऱ्यांकडून खरेदी
माणदेश एक्सप्रेस न्युज
माळशिरस/प्रतिनिधी: पांडुरंग सहकारी साखर कारखान्यामध्ये उत्पादीत होत असलेल्या साखरेची गुणवत्ता व गोडी ग्राहकांच्या पसंतीस कमालीची उतरली असल्याने संपूर्ण फलटण तालुक्यातून पांडुरंगच्या साखरेस मागणी आहे. असे गौरवोद्गार फलटणच्या श्रीराम बझारचे व्यवस्थापक सस्ते यांनी काढले.
पांडुरंग कारखान्याच्या व्यवस्थापनाने काळाची पावले ओळखत मार्केटिंग मध्ये उतरण्याचा निर्णय घेतला त्याचाच भाग म्हणून दिपावली सणाचे पूर्वसंध्येला आकर्षक पॉलॉपॅकींगच्या माध्यमातून १, ३, ५, व १० किलोच्या पॅकींग पिशव्या बाजारात आणल्या त्याचे उद्घाटनाचे कार्यक्रमात ते बोलत होते.
प्रथम कारखान्याचे चेअरमन सुधाकरपंत परिचारक, उपाध्यक्ष वसंतनाना देशमुख, श्रीपूर पत्रकार संघाचे अध्यक्ष राजू मुलाणी यांचे हस्ते पांडुरंगाच्या प्रतिमेचे पुजन करणेत आले. यावेळी पत्रकार राजू मुलानी, प्रकाश केसकर, महादेव जाधव, सुखदेव साठे, दत्ता नाईकनवरे व अधिकाऱ्यांच्या हस्ते व्यापाऱ्यांना साखरेचे नवीन पॅकिंग देऊन साखर विक्रीचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी माजी चेअरमन दिनकरभाऊ मोरे, संचालक बाळासाहेब यलमार, भिमराव फाटे, दाजी पाटील, कार्यकारी संचालक यशवंत कुलकर्णी, वर्क्स मॅनेजर आर.बी. पाटील, चिफ केमिस्ट एम.आर. कुलकर्णी, मुख्य शेती अधिकारी कुमठेकर, मुख्य लेखापाल रविंद्र काकडे, इस्टेट मॅनेजर रमेश गाजरे, सेक्रेटरी भिमराव बाबर, आदी उपस्थित होते.
प्रथम कार्यकारी संचालक यशवंत कुलकर्णी यांनी काळाची पावले व गरज ओळखून आम्ही छोट्या पॅकींगच्या माध्यमातून बाजारात उतरत आहोत. असे प्रास्ताविकात सांगितले.
यावेळी सुधाकरपंत परिचारक यांनी आत्ताच नाही तर कै.आगाशे यांच्या काळा पासून व्यापाऱ्यांनी या कारखान्याच्या कारभारावर विश्वास ठेवून सहकार्य केले आहे. आमचा सभासद चांगला ऊस पिकवतो, अधिकारी कामगार उत्तम प्रक्रिया करून चांगली साखर तयार करतात तर व्यापारी चांगला भाव देतात म्हणूनच कारखान्याची प्रगती होत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुधीर पोफळे यांनी केले तर आभार हनुमंत नागणे यांनी मानले.