महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाकडून निताताई केळकर यांचा सत्कार
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/वार्ताहर: बुधवार दि. 13 नोव्हेंबर रोजी कंत्राटी कामगार संघाचे प्रमुख मार्गदर्शक आण्णाजी देसाई तसेच महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्रीमंत काळेल, अमर लोहार, सांगली जिल्हा अध्यक्ष गणेश पाटील, उपाध्यक्ष महादेव पवार, सचिव शितळ गळवे, कोल्हापूर सर्कल सचिव राहुल भालबर, डिव्हेजन सचिव राहुल पवार यांनी नीताताई केळकर यांची महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ संचालकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून पुष्पगुच्छ सत्कार केला कंत्राटी कामगारांच्या संदर्भात चर्चा करून भेट घेतली.
महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघांनी आज पर्यंत केलेल्या कामकाजाचा आढावा त्यांना देण्यात आला. यावेळी आण्णाजी देसाई यांनी या विविध उद्योगात पूर्वाश्रमीची जी रोजंदारी कामगार पद्धती होती त्या नॉमिनल मस्टर रोल म्हणजेच NMR या पद्धती बद्दल सविस्तर माहिती दिली. यासाठी संघटनेने 22 एप्रिल 2015 रोजी ऊर्जामंत्र्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत आढावा दिला. यासाठी संघटनेच्या प्रयत्नातून समितीदेखील स्थापन झाल्याचे सांगितले. मात्र हा विषय आता शासन दरबारी असून आता संचालक मंडळाने व आपण स्वव: या प्रश्नाअत लक्ष घालून गेली दहा ते पंधरा वर्ष या वीज उद्योगात अथक मेहनत केलेल्या कामगारांना या योजनेद्वारे न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करावा अशी आग्रही मागणी केली.
वर्षानुवर्षे महावितरण कंपनी चा महसूल मोठ्या प्रमाणात वसूल करणे, प्रसंगी ग्राहकांची नाराजी अंगावर ओढवून घेणे, ऊन, वारा, थंडी, पाऊस याची तमा न बाळगता जनतेला अखंड सेवा देणे. ही सर्व कामे रिक्त पदांच्या जागेवर गेली पंधरा ते वीस वर्षे कंत्राटी कामगार यांनी नित्यनियमाने व प्रामाणिकपणे केली आहेत. परंतु महाराष्ट्रामध्ये कंत्राटदार व प्रशासनातील काही अधिकारी मिळून कंत्राटी कामगारांचे आर्थिक शोषण करत आहेत. कामगारांचा भविष्य निर्वाह निधी न भरणे, विमा न उतरवणे, यांच्या वेतनातून अनाधिकृत कपात करणे, वेतन बँकेत जमा केल्यानंतर अथवा अगोदर अनाधिकृत रक्कम कंत्राटदार परत मागून घेतात याबाबत कोणतीही तक्रार देता येत नाही अन्यथा नोकरी गमावण्याची ची भीती कामगारांना असते. यामुळे खऱ्या कष्टकरी कामगारांना काम करून देखील पूर्ण मोबदला हाती पडत नाही. यासाठी वीज उद्योगातील रोजंदारी कामगार पद्धत पुन्हा सुरू केल्यास या कामगारांना त्यांनी केलेल्या कष्टाचा मोबदला मिळेल आणि कंत्राटदारांना द्यावे लागणार 5 % नफ्याची रक्कम व 18% निष्कारण भरावा लागणारा GST असे 23 % रक्कम कंपनीची वाचेल. यासाठी संचालक या नात्याने आपण पाठपुरावा करावा अशी मागणी आण्णाजी देसाई तसेच कंत्राटी कामगार संघाचे पदाधिकारी यांनी केली.
यावर निश्चितच संचालक मंडळाची बैठक बोलावून त्यात सकारात्मक चर्चा तसेच महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाला चर्चेसाठी पाचारण करेल अशी ग्वाही नीताताई यांनी संघटनेला दिली.