पैसा शेतकऱ्यांचा, पाण्यावर हक्क मात्र शासनाचा!
पैसे भरून आलेले पाणी राखीव नको-शरद काळेल
माणदेश न्यूज नेटवर्क
आटपाडी : निंबवडे तलावात शेतकऱ्यांनी भरलेल्या पैशावर येऊ घातलेल्या टेंभूच्या पाण्यावर प्रशासनाने राखीव पाणीसाठ्या चे नामी शक्कल लढवून विकत घेतलेल्या पाण्यावरही शेतकऱ्यांचा हक्क सोडावा लागण्याची शक्यता आहे.
निंबवडे तलाव पूर्णपणे कोरडा ठणठणीत पडलेला असून या तलावावर आधारित सर्व पाणी योजना बंद पडलेल्या असल्याने तसेच परिसरात पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली असून विहिरीच्या पाण्याने तळ गाठण्यास सुरुवात केली असल्याने पिण्यासाठीही पाणी उरले नाही.
निंबवडे तलावात अजिबात पाणी साठा नाही. अशा परिस्थितीत पिक पाणी जगवण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी टेंभू योजनेचे पाणी मिळावे म्हणून पाण्यासाठी पाणीपट्टी चे पैसे भरले. तलावात पाणी सोडण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या व निंबवडे तलावात टेंभू योजनेचे पाणी येण्यास सुरवात झाली आहे. या तलावाची पाणी साठवण क्षमता 230 एमसीएफटी असून त्याची मृत पाणीसाठा 35 एमसीएफटी इतका आहे. परंतु सध्या तलावात 0 एमसीएफटी पाणीसाठा आहे. तलाव कोरडा असल्यामुळे राखीव पाणीसाठ्याचा आतापर्यंत प्रश्न उद्भवला नाही मात्र टेंभू योजनेचे पाणी दाखल झाल्यानंतर हे पाणी तलावात साठणार असून ह्या पाण्यासाठी परिसरातील लाभार्थी शेतकऱ्यांनी पैसे भरले असल्याने पाणी आले आहे.
परंतु आम्ही शेतकऱ्यांनी विकत घेतलेल्या पाण्यावर प्रशासन आमचा राखीव पाणीसाठा आहे तो तुम्हाला उचलता येणार नाही अशी भूमिका घेऊन शेतकऱ्यांची गळचेपी करण्याची शक्यता आहे. अशा स्वरूपाचा प्रकार मागील वेळी घडला होता त्यामुळे शेतकऱ्यांनी पैसे भरून शेतकऱ्यांचा कोणत्याही फायदा झालेला नव्हता. राखीव पाणीसाठ्यामुळे त्यांना संघर्ष करावा लागला होता यावेळी वेळी असा प्रकार घडता कामा नये जर घडला तर मात्र आम्हाला सनदशीर मार्गाने न्याय मागवा लागले असा इशारा युवा नेते गळवेवाडी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य शरद काळेल यांनी दिला आहे.