टेंभूचे पाणी पिण्यासाठी द्या: आम.बाबर
आटपाडी येथे बैठक संपन्न
माणदेश न्यूज नेटवर्क/आटपाडी : टेंभू योजनेचे पाणी प्रथम पिण्यासाठी द्या आणि मग शेतीचा विचार करा, पिण्याच्या पाण्याच्या योजना ज्या ठिकाणी आहेत, त्या ठिकाणी हे पाणी सोडून समस्या निकालात काढा, अशा सूचना आमदार अनिल बाबर यांनी आटपाडी येथे अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
आटपाडी तालुक्यातील अनेक गावांमध्ये टँकरची मागणी वाढत असून तालुक्यात पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. टेंभूचे पाणी तालुक्यात फिरवल्यास ही समस्या दूर होणार आहे. यासाठी प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करून टेंभूचे पाणी आटपाडीच्या विविध भागात फिरवावे. अशा सूचना दिल्या. आटपाडी येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीला तहसिलदार सचिन लंगुटे, टेंभू उपसा सिंचन योजनेचे उपअभियंता केंगार, माजी जिल्हा परिषद सदस्य अण्णासाहेब पत्की, शिवसेनेचे तालुका नेते तानाजीराव पाटील, आटपाडी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी मीना साळुंखे, पाणीपुरवठा विभागाचे अभियंता शेंडगे, विष्णुपंत पाटील, आटपाडीच्या सरपंच सौ.वृषाली पाटील, ॲड. धनंजय पाटील, दत्तात्रय पाटील, मोहनराव देशमुख, सरपंच गणेश खंडारे, सरपंच रामदास सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
आटपाडी तालुक्यातील टँकरची मागणी असणारी गावे व वाड्या वस्त्यावर सुरू असणारे अधिग्रहण, पिण्याच्या पाण्याची स्थिती, याबाबतची माहिती घेतली. सध्या सुरू असणाऱ्या उपाययोजनाबाबत चर्चा करण्यात आली. टेंभू योजनेचे सध्या सुरू असलेले पाणी आटपाडी तालुक्यात ज्या-ज्या गावच्या पाणी योजना तलावांवर आहेत, तेथे प्राधान्यक्रमाने प्रथम पाणी सोडावे. आटपाडी, निंबवडे, कचरेवस्ती,झरे येथे तातडीने टेंभूचे पाणी सोडून येथे पिण्याच्या पाण्यासाठी 25 ते 30 टक्के साठा करावा व त्यानंतर शेतीच्या पाण्याचे नियोजन करावे. चिंचाळे येथील गेट बंद असून ते तातडीने खुले करावे, बुद्धेहाळ तलावाला करगणी मार्गे पाणी सोडावे आणि या मार्गावरील शेतकऱ्यांनी तातडीने पैसे भरावेत. 81-19% निर्णयामुळे पाणीपट्टी कमी झाली आहे, त्यामुळे सर्वांनी पैसे भरावेत, असे आवाहनही केले. हिवतड-शुकाचार्य येथे कालव्यावर गेट करण्याबाबतही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मोबाईलवरून चर्चा करून कार्यवाही करावी.राष्ट्रीय पेयजल योजनेमध्ये समाविष्ट असणाऱ्या गावांच्या उद्भवाचे नियोजन करावे, मुढेवाडी गावासाठी कामथ तलावातून पाणी योजनेचा स्रोत निर्माण करावा, पळसखेल तलावावरील वीज पुरवठा बंद आहे, त्यामुळे या गावाची पाणीयोजना ठप्प आहे, त्याबाबत डिझेल पंप किंवा जनरेटरची सोय करावी अशा सूचना तहसीलदार यांच्यासह अधिकाऱ्यांना दिल्या.खांजोडवाडीसाठी टेंभूचे पाणी सोडण्याबाबत कार्यवाही करावी. नांगरेमळा येथील वस्तीसाठी टंचाईतूनच पाइपलाइनची सोय करावी, आटपाडी तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढून शेतीच्या पाण्याबाबत नियोजन व्हावे, सध्याची गरज भागवून पुढील पावसापर्यंत पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, असे ते म्हणाले. अभियंता केंगार यांनी या कार्यपद्धतीने तात्काळ कार्यवाही सुरू करण्याची ग्वाही दिली. टेंभूच्या पाण्याचे नियोजनात संदीप पाटील यांनी विशेष लक्ष द्यावे, असे सांगण्यात आले. महाराष्ट्र वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता गुरव यांनाही लोकांच्या समस्याबाबत कार्यवाहीच्या सूचना देण्यात आल्या. या बैठकीला शिवसेनेचे तालुकाध्यक्ष साहेबराव पाटील, पुजारवाडीचे पै.संतोष पुजारी, मनोज नागरे, सोमनाथ गायकवाड, बबलू पवार, दादासाहेब कुचेकर, दत्ता सरगर, तुकाराम जानकर, मुढेवाडीचे सरपंच अनिल मुढे, प्रकाश बनसोडे, वसंतराव हाके, संजय यमगर, दौलत चव्हाण, यांच्यासह विविध गावचे पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.